चिक्कबळ्ळापुरातील हिरेनागवल्ली येथे खडी क्रशरजवळ सोमवारी मध्यरात्री घटना
प्रतिनिधी/ बेंगळूर
शिमोगा जिल्हय़ातील हुणसोडू येथील क्वारीमध्ये जिलेटीनच्या स्फोटात 8 जण ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ातील हिरेनागवल्ली येथे खडी क्रशरजवळ सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्फोट झाला. या घटनेत 6 जण ठार झाले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली असून सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे.
चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील हिरेनागवल्ली येथील भ्रमरवासिनी क्रशरपासून 1 कि. मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास जिलेटिन कांडय़ांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाले. तर एकाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका जखमीवर चिक्कबळ्ळापूर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत क्रशर इंजिनियर उमाकांत, कॉम्प्युटर ऑपरेटर गंगाधर, वेयर मुरळी, सुरक्षा रक्षक महेश व स्थानिक रहिवासी रामू यांचा मृत्यू झाला आहे. टाटा एस वाहनचालक रियाज गंभीर जखमी झाला आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, भ्रमरवासिनी क्रशरपासून एक कि. मी. अंतरावर वनप्रदेशात लपवून ठेवलेल्या जिलेटिन कांडय़ा आणि इलेक्ट्रिक डिटोनेटर आणण्यासाठी टाटा एस वाहन आणि एका दुचाकीवरून सात जण गेले होते. हे स्फोटक आणत असताना अचानक जिलेटिन कांडय़ांचा स्फोट झाला. परिणामी पाच जणांच्या चिंधडय़ा उडाल्या. तर एका गंभीर जखमीचा इस्पितळात मृत्यू झाला.
स्फोटानंतर या भागातील अनेक क्वारी मालकांनी कुटुंबासह रातोरात गाव सोडले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. आरोपी नागराज, पेय्यल राघवेंद्र रेड्डी, नरसिंहमूर्ती, पेयल वेंकटशिवा रेड्डी यांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकून तपासणी केली. मात्र, आरोपींनी मोबाईल स्वीच ऑफ केल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी भ्रमरवासिनी क्रशरचा मालक नागराजू हा स्थानिक भाजप नेता असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
मागील आठवडय़ात या क्रशरवर छापे टाकून बेकायदेशीरपण साठवून ठेवण्यात आलेली स्फोटके जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी रात्री वनभागात लपवून ठेवण्यात आलेली स्फोटके इतरत्र हलविण्यात येत असताना स्फोट झाला असावा, असा संशय आहे.
गृहमंत्र्यांना धक्का
घटनेविषयी माहिती मिळाल्यानंतर गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्फोट झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना धक्काच बसला. हिरेनागवल्ली गावच्या 250 ते 300 एकर परिसरातच तब्बल 53 क्वारी असल्याचे बोम्माई यांच्या निदर्शनास आले. येथील टेकडय़ा स्फोट घडवून सपाट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी किती क्वारींनी परवाने मिळविले आहेत. याविषयी माहिती मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सायंकाळपर्यंत मुदत दिली.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख
स्फोटामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या क्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा आदेश गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला आहे. स्फोटप्रकरणी सत्यासत्यता उजेडात येण्यासाठी हे प्रकरणी सीआयडीकडे सोपविण्यात येत असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी देखील या घटनेला कारणीभूत असणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱयांना ट्विटरवर दिली आहे.
स्फोटकांसाठी नवी नियमावली तयार करणार
क्वारी आणि खाणींच्या प्रदेशात परवानगी घेतलेल्यांनीच स्फोटकांचा वापर करावा. त्याकरिता नवी नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती खाण आणि भू-विज्ञानमंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी ते बोलत होते. काहीजण बेकायदेशीरपणे क्वारी आणि खाण प्रदेशात स्फोटकांचा वापर करीत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात येतील. सध्या अनेक ठिकाणी बेकायदा खाणींवर कारवाई करण्यात येत आहे. एखाद्या वेळेस आपल्या खात्यातील अधिकाऱयांकडूनच साहाय्य होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही निराणी यांनी दिला.