प्रतिनिधी/कोल्हापूर
जिह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम सोमवारी, 11 मे पासून सुरू होणार आहे. पुरेशी खबरदारी घेऊन दस्त नोंदणी सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले.
कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम 23 मार्चपासून बंद ठेवले आहे. कोरानाच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱया परिणामावरील उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली होती. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत सुरु करून मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरु करण्याबाबत आदेश आहेत. त्यानुसार जिह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम 11 मेपासून सुरु करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशात बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करुन दस्त नोंदणी करताना दिलेल्या सूचनांचे पालन बंधनकारक राहील. कार्यालय सुरु करण्याच्या दिवशी व नंतर रोज संपूर्ण कार्यालयाचे निर्जतुकीकरण करावे, त्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईड सोल्युशनचा वापर करावा, शिपायांना त्याचे प्रशिक्षण दयावे. सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयातील कर्मचाऱयांना मास्क, स्वच्छ रुमाल, ग्लोव्हज सॅनिटायझर, कागद, कापुस, पेपरबॅग आदी उपलब्ध करावे, पटाचा दरवाजाच्या दोन्ही बाजूंचा भाग, हॅण्डेल्स, नोब्स, टेबल, खुर्चीचे दर तासाला निर्जंतुकीकरण करावे, अधिकारी, कर्मचाऱयांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा, नागरीकांना पाणी, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे. प्रत्येक दस्त नोंदणी करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापुर्वी व वापर केल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करावे. नोंदणीसाठी येणाऱयांना फक्त लिहून घेणार, देणार व्यक्ती आणि साक्षीदार एवढयाच लोकांना नोंदणीसाठी कार्यालयात येण्याची सूचना करावी. कार्यालयाने पुरेसे कर्मचारी दस्त नोंदणीसाठी नेमावे, दस्त नोंदणीसाठी आवश्यक नागरीकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी द्यावी, 60 वर्षांवरील आणि 20 वर्षाखालील नागरिकांनी व्यवहारांसाठी लॉकडाऊन संपेपर्यंत कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.
लिव्ह ऍण्ड लायसन्स व नोटीस ऑफ इंटीमेशन या दोन्ही दस्ताचे कार्यालयात येऊन प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन हे जुलैपर्यंत थांबवले आहे. त्यामुळे नागरिकांनी यासाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधू नये, नोटीस ऑफ इंटिमेशनसाठी ऑनलाईन सुविधा बंधनकारक आहे. कार्यालयीन परिसरात दस्तलेखक, मुद्रांक विक्रेते व वकीलांना थांबण्यास प्रतिबंध आहे. नोंदणी कार्यालयामध्ये जुनअखेरपर्यंत मृत्यूपत्र, वाटणीपत्र या नोंदी वैकल्पिक असलेल्या तसेच हक्कसोडपत्र नात्यातील बक्षीसपत्र, चुक दुरूस्तीपत्र या कमी महत्वाच्या दस्तांची नोंदणी थांबवण्यात येत आहे. या प्रकारांपैकी ज्या दस्तांची कलम 23 प्रमाणेची मुदत संपणार आहे तेच दस्त या कालावधीत नोंदणीसाठी स्वीकारता येणार आहेत. मुद्रांक जिल्हाधिकाऱयांनी जुलैपर्यंतचे तपासणी दौरे पुढे ढकलावेत. विशेष विवाह नोंदणी कामी विवाह अधिकारी वर्ग-2, करवीर क्र.1 यांची नियुक्ती केली आहे. विवाह नोंदणीसाठी कार्यालयात येताना वधू व वर तसेच तीन साक्षीदारांनीच हजर राहावे, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले आहे.