विशेष पॅकेज देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोविडच्या दुसऱया लाटेमुळे बळीराजा मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला.
शेतकऱयांना सरकारने पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य करावे. कोरोना काळात मृत्यू झालेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना किमान पाच लाख रुपये द्यावेत. बी-बियाणे आणि खतांसाठी सबसिडी द्यावी. शेतकऱयांनाही तातडीने लस द्यावी, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शेतकरी आणि कामगारांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. लॉकडाऊनमुळे हे दोन्ही घटक अडचणीत आले आहेत. पण शेतकऱयांकडे पूर्णच दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोपही करण्यात आला. केरळ, आंध्रप्रदेश राज्यांनी शेतकऱयांना विशेष पॅकेज दिले आहे. त्याचप्रकारे कर्नाटकातील शेतकऱयांनाही पॅकेज द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिद्धगौडा मोदगी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल बेनके यांनाही निवेदन देण्यात आले.