दुसरा टप्पा सुरू : जिल्हावासीयांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी – के. मंजुलक्ष्मी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हावासियांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
प्रत्येकाने कोविडची लस घ्यावी. आपल्या कुटुंबियांनाही लस द्यावी. कोणीही मागे राहू नये. जिल्हय़ात पहिल्या टप्प्यातील उद्दिष्टाच्या 60 टक्के लसीकरण झाले आहे. उर्वरित लाभार्थींनीही स्वतः पुढाकार घेऊन लस घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले. तर सर्वांनी लवकरात लवकर लस घेऊन सहकार्य करावे. सर्व सहकारी व नातेवाईक यांना याविषयी आश्वस्त करावे व लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना लस आल्यानंतर 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी दुसरा टप्पा सुरू झाला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी स्वत: लस घेऊन दुसऱया टप्प्याला सुरुवात केली. दुसऱया टप्प्यात महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना लस दिली जाणार आहे.