प्रत्येक स्थानाचे इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते आणि प्राचीन काळातील आठवणी साठवून ठेवण्याचे काम तेथील संग्रहालये करत असतात. पुढील पिढय़ांना प्राचीनकाळातील कलासंस्कृतीची जाणीव याच संग्रहालयांच्या माध्यमातून होत असते. पण खंडवाच्या जिल्हाधिकाऱयांनी केवळ कुणी येत नसल्याने संग्रहालयच बंद करण्याचा अजब आदेश दिला आहे. या आदेशानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी प्राचीन मूर्त्या आणि अमूल्य ठेवा ओंकारेश्वरमध्ये हलविण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
संग्रहालय पाहण्यासाठी कुणीच येत नसल्याने आता याची आवश्यकताच नसल्याचे उद्गार खंडवाचे जिल्हाधिकारी अनय द्विवेदी यांनी काढले आहेत. या संग्रहालयाचा उद्देश विखुरलेल्या मूर्त्यांचे संरक्षण करणे आहे. येथे 283 मूर्त्या असून त्या नवव्या ते 16 व्या शतकापर्यंतच्या आहेत. यात अनेक दुर्लभ मूर्त्या असून यात द्वादश सूर्य प्रतिमा आहे. हे संग्रहालय 26 जानेवारी 1988 रोजी सुरू करण्यात आले होते अशी माहिती तेथील मार्गदर्शक शैलेश यांनी दिली आहे.
तर खंडवातील संग्रहालय हटविण्याच्या आदेशामुळे जनतेत संताप पसरला आहे. शहराला एखादी गोष्ट मिळण्यास कित्येक वर्षे लागतात आणि जे उपलब्ध आहे, ते देखील न राहणे अत्यंत त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे. जिल्हाधिकाऱयांना संग्रहालय बंद करण्याचा कुठलाच अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खंडवा हे नाव खांडव वनापासून प्राप्त झाले आहे, येथे 11 व्या शतकातील अनेक जैनसंस्कृतीशी संबंधित मूर्त्या सापडल्या आहेत. 30 वर्षांपूर्वी अथक प्रयत्नानंतर हे संग्रहालय स्थापन करण्यास यश आले होते. लोक येत नाहीत याचा अर्थ हे बंद केले जावे असा होत नाही. आम्ही राजकीय क्षेत्रात असून एखाद्या गोष्टीची घोषणा करविण्यासच अनेक वर्षे लागतात, अशा स्थितीत अस्तित्वात असलेली गोष्ट हटविण्याचा आदेश चुकीचा असल्याचे भाज प्रवक्ते सुनील जैन म्हणाले.