प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाचे दरवाजे यापुढे सदैव खुले राहणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबाजावणी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध कामानिमित्त भेटण्यासाठी आता कोणत्याही चिठ्ठीची गरज भासणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे प्रमुख प्रशासकीय कार्यालय. जिह्यातील कानाकोपऱयातून आणि ग्रामीण भागातील अनेक नागरिक त्यांचे विविध प्रश्न आणि कामे घेऊन याठिकाणी येत असतात. जिल्हाधिकाऱयांना भेटायचे म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना चिठ्ठी द्यावी लागते. यानंतर अनेक वेळ प्रतीक्षा करूनही जिल्हाधिकारी भेटणार की नाही ? याची खात्री नसते. मात्र यापुढे जिल्हाधिकाऱयांना भेटताना कोणत्याही चिठ्ठीची गरज भासणार नाही. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हा अनोखा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दालनाचे दोन्हीही दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा आपल्यावर पगडा असून येथे लोकाभिमुख कामकाज करण्याचा मानस असल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय
दरम्यान जिल्हाधिकारी रेखावार यांच्या या निर्णयावर सर्वसामान्य नागरिकांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे लांब अंतरावरून येणाऱया नागरिकांचा वेळ वाचणार आहे. जिल्हाधिकाऱयांना कोणत्याही चिठ्ठी शिवाय थेट भेटता येणार असल्याने हा निर्णय म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक ठरणार आहे.