प्रतिनिधी / महाबळेश्वर
जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. महाबळेश्वर पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातुन चांगलेच कौतुक केले जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत अत्यावश्यक कामासाठीच जिल्हा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे परंतु सहलीसाठी जिल्हा बंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे.
मुंबईच्या पर्यटकांनी लॉकडाऊन जाहीर झाल्या नंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला त्यांनी या साठी महाबळेश्वर येथील हॉटेल लि मेरिडीयन मधील रूम ऑनलाईन बुक केल्या ठरल्याप्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्ह्याच्या सिमा ओलांडुन महाबळेश्वरात दाखल झाले. सायंकाळी पर्यटक येथील नाक्यावर आले असता त्यांनी हॉटेल बुकिंग असल्याचे सांगुन शहरात प्रवेश केला ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने पर्यटकांच्या शोधासाठी पथक रवाना केले या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छ. शिवाजी महाराज चौकात पकडली तर इतर दोन गाडया हॉटेलच्या प्रवेश व्दारावर पकडल्या.
अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकारी यांच्या लक्षात आले त्यांनी या बाबत पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना सर्व हकिकत सांगितली मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशा नुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार तर या पर्यटकांना हॉटेल मध्ये प्रवेश दिल्या बद्द्ल हॉटेल व्यवस्थापनास 25 हजार रूपये दंड आकारला या कारवाईत विशेष पथकाने 55 हजाराचा दंड वसुल केला पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे शहरातुन कौतुक केले जात आहे.
या प्रकरणाने मागील वर्षी घडलेल्या उद्योगपती वाधवान बंधु यांच्या प्रकरणाची महाबळेश्वरकरांना आठवण झाली मागील वर्षी अशाच प्रकारे लॉकडाऊन मुळे जिल्हयाच्या सिमा बंद करण्यात आल्या होत्या.
असे असतानाही लोणावळा येथील आपल्या फार्म हाउसमध्ये रहात असलेले वाधवान बंधु हे आपल्या कुटूंबांसोबत महाबळेश्वर येथील आपल्या बंगल्यात राहण्यासाठी येथे आले होते. येताना कोणी अडवु नये म्हणुन गृह विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी गुप्ता यांचे पत्र. त्यांनी सोबत आणले होते. याच पत्रामुळे मोठा गोंधळ उडाला होता. जिल्हाबंदी आदेश मोडण्यासाठी पोलिस अधिकारी यांनी बेकायदेशीर उदयोगपतींना मदत केल्याने या प्रकरणाने महाराष्ट्रात चांगलीच खळबळ माजली होती. या प्रकरणाने विरोधकांना आयतेच कोलित दिले होते. या प्रकरणाचे स्पष्टकरणासाठी राज्याचे गृहमंत्री यांना समोर यावे लागले होते उद्योगती वाधवान बंधु यांच्या त्या वेळी जप्त केलेल्या आलिशान गाड्या आजही पांचगणी पोलिस ठाण्याबाहेर गेली अनेक महीने धुळखात पडुन आहेत.