अत्यावश्यक वगळता सर्व सेवा बंद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘बेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना सोबत ओळखपत्र बाळगावे लागणार असून खाद्यपदार्थ, किराणा सामान व भाजीपाला व्यावसायिकांनी घरपोच सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही फक्त अत्यावश्यक घटकांसाठीच सुरू ठेवण्याचे आदेश जारी झाले आहेत. लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी सर्वत्र काटेकोर पोलीस तपासणी होणार आहे. जिल्हय़ात कोणालाही कोरोना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरूवारपासून संचारबंदीत काय सुरू व काय बंद राहणार, या बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पुढील 15 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही सेवा सुरू राहणार नाही, जास्तीत-जास्त घरपोच सेवा देण्यात यावी, दुकानदार व तेथील कामगारांसाठी कोरोना चाचणी अत्यावश्यक करण्यात आली आहे. रात्री 8 ते सकाळी 7 पूर्णपणे संचारबंदी असून याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. जिल्ह्भार ठिकठिकाणी पोलीस तपासणी मोहीम सुरू होणार आहे. अत्यावश्यक कामासाठी जाणाऱयांनी ओळखपत्र सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सी असेल तर मुभा देण्यात येईल. अन्यथा कोणालाही परवानगी नसल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
अत्यावश्यक शासकीय बांधकामे वगळता अन्य खासगी बांधकाम कामांनाही परवानगी नसल्याचे जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. शासकीय व अन्य कामाच्या ठिकाणी केवळ 50 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्याही सूचना या लॉकडाऊनच्या निमित्ताने देण्यात आल्या आहेत. रिक्षा, एस.टी सेवा सुरू राहणार असली तरीही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांची ने-आण करण्यासाठीच ही सेवा आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य कोणालाही अशा वाहनांमधून प्रवास करता येणार नाही.
जिह्याबाहेरून येणारी व्यक्ती कोरोना चाचणीशिवाय आलेली असल्यास या ठिकाणी त्यांची चाचणी सक्तीची करण्यात आली असून त्यासाठी रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. कशेडी घाटातही यंत्रणा उभारण्यात आली असून याची कोटकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.
किराणा, भाजीपाला, व इतर खाद्यपदार्थ घरपोच देण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे, मात्र दुकानदार व तेथील कामगारांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक सोसायटी किंवा एखाद्या परिसरात भाजीपाला हातगाडीने विकण्याची परवानगी देण्याच्या सूचना नगर परिषद व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. एखाद्या मोकळय़ा मैदानात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शॉपिंग, सिनेमा, वॉटरस्पोर्ट, धार्मिक स्थळे, स्पा सलोन, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहणार असून सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम घेण्यावर बंदी असणार आहे.
जिल्हय़ात 1600 बेड तयार असून खासगी कोरोना सेंटरबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या व्हेंटीलेटर व ऑक्सिजन पुरवठा मुबलक असला तरी भविष्यात याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजन सुरू आहे. रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलमध्ये येत्या 8 दिवसात ऑक्सिजन प्लॅन्टही सुरू होणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.
होम आयसोलेशनची माहिती कॉल सेंटरव्दारे
कोरोना संख्या वाढत असली तरी लक्षणे नसलेल्या व्यक्ते पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण अधिक आहे. लक्षणे नाहीत, मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे अशा रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. याचे प्रमाण 60 टक्के इतके आहे.
लसीकरण करून घ्यावे..
लसीकरणानंतर कोरोना होत नाही, असे नाही. मात्र लसीकरणानंतर त्याचा अधिक त्रास होत नाही. त्यामुळे लसीकरण करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सध्या खासगी फिजिशियन
जिल्हा शासकीय रूग्णालय व कोरोना रूग्णालयात सध्या फिजिशियनची समस्या खासगी डॉक्टरांच्या सहकार्यामुळे मार्गी लागली असून खासगी फिजिशियन मदतीसाठी पुढे आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी, खेड, चिपळुणात मोबाईल व्हॅनव्दारे कोरोना चाचणी
ज्यांना हॉस्पीटलमध्ये जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी, खेड व चिपळूण या तीन तालुक्यात कोरोना चाचणीसाठी मोबाईल व्हॅन सुरू करण्यात आली आहे.
हेल्पींग हॅण्ड, शिक्षक पोलीस मित्र म्हणून सहकार्य करणार
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाला नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. यासाठी हेल्पींग हॅण्डचे सर्व सदस्य आणि शिक्षकसुध्दा मदतीसाठी घेतले जाणार असल्याचे मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.