प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन जाहीर केले असून या दोन्ही दिवशी जिल्हावासियांनी 100 टक्के प्रतिसाद देत पूर्णपणे दुकाने वगैरे बंद होते. जिल्हय़ातील सर्व रस्ते हे सामसुम झाले होते. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून खबरदारी घेतली जात असुन केवळ अत्यावश्यक सेवेतील लोक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात रूग्णांना दाखल करण्यासाठी आता रांगा लागत असून ही अतिशय वाईट परिस्थिती सध्या जिल्हय़ात आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्हय़ात 30 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन केले आहे. तसेच कोरोना चाचणींवर प्रशासनाने अधिक भर दिला असून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. चाचण्या वाढविल्यामुळे रूग्ण संख्या वाढली असली तरी कोरोनाचा प्रसार यानिमित्ताने कमी होईल असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
रविवारीदेखील जिल्हय़ात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच अनावश्यक फिरणाऱया नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते मात्र यावेळी कोणीही बाहेर पडले नाही. सर्व रस्ते सामसुम झाले होते.
चौकट
6 मिनिट वॉक टेस्ट करा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आणि वाढते मृत्यूदर पाहता आता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 6 मिनिट वॉक टेस्ट करा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ज्यांना कोरोनाची लक्षणे अथवा सर्दी, ताप, खोकला किंवा इतर लक्षणे असतील त्य़ांनी पल्स ऑक्सिमीटर च्या सहाय्याने ही तपासणी करायची आहे. यासाठी बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून आणि त्यावर दिसणाऱया रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा, पल्स ऑक्सिमीटर बोटाला लावून घरातल्या घरात घडय़ाळ लावून सहा मिनिटे चाला अति वेगात किंवा अति हळू चालू नये, मध्यम आणि स्थिर गतीने चालणे. सहा मिनिटे सलग स्थिर गतीने चालून झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा. रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्या नंतर 93 पेक्षा कमी होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा 3 टक्कय़ांपेक्षा अधिक कमी होत असेल, सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे असा त्याचा अर्थ होतो. असे होत असेल तर लवकरात लवकर रूग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.