नव्या पालकमंत्र्याची पहिलीच सभाः पुढील वर्षाचा आराखडा होणार सादर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा नियोजन समितीची सभा मंगळवार 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता नव्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षेखाली होणारी ही पहिलीच सभा असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली 10 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा झाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणूक होऊन नवे सरकार स्थापन झाल्यावर चार महिन्यांनी सभा होत आहे. नवे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच सभा आहे. पालकमंत्री बदलले, तरी अन्य आमदार, खासदार व सदस्य पूर्वीचेच आहेत. मात्र, राणेसमर्थक सदस्य अधिक आहेत. त्यामुळे दीपक केसरकर पालकमंत्री असताना वादळी सभा होत होत्या. तशा सभा होणार का? नवे पालकमंत्री कशा पद्धतीने सभा हाताळतात, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा नियोजन समितीत नवे पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, खासदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे तसेच अन्य पदवीधर व शिक्षक आमदार, सदस्य, त्याशिवाय जिल्हा नियोजन समितीवर निवडून आलेले जि. प. सदस्य, पदसिद्ध सदस्य, जि. प. सदस्य, अधिकारी वर्ग, निमंत्रित सदस्यही असणार आहेत. नव्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचीही पहिलीच सभा असणार आहे.
250 कोटीपर्यंत आराखडा जाणार
21 रोजी होणाऱया जिल्हा नियोजन समिती सभेत 2019-20 या चालू वर्षाच्या जिल्हा वार्षिक आराखडय़ाच्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर 2020-21 या पुढील वर्षाचा आराखडा सादर करून राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. 2019-20 चा वार्षिक आराखडा 225 कोटींचा आहे. त्यात वाढ होऊन 250 कोटांपर्यंत आराखडा जाण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या 225 कोटीच्या आराखडय़ामधून आतापर्यंत 134 कोटींचा निधी प्राप्त होऊन 70 कोटींचा निधी खर्च झाला आहे. मार्च अखेरपर्यंत सर्व निधी प्राप्त होऊन शंभर टक्के निधीही खर्च होईल, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी दिली.