गर्दी टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे न्यायालयाचे दैनंदिन कामकाज बंद ठेवण्यात आले होत़े आता केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशावरून मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवार 8 जूनपासून जिल्हा न्यायालय सुरू होत आहे. न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी कामकाज करण्याबाबत मार्गदर्शक सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत़
जिह्यातील न्यायालयाचे काम दोन सत्रात चालणार आहे. सकाळी 10 ते 1 व दुपारी 2.30 ते 5.30 ही वेळ राहणार आहे. प्रत्येक न्यायालयात जास्तीत-जास्त 15 केसेस हाताळता येणार आहे. एका सत्रात 50 टक्के न्यायाधीश व इतर कर्मचारी कामकाज करणार आहेत. निकालाच्या जवळ असलेले खटले प्राधान्याने चालवण्याचे निर्देश आहेत. जिथे एकच कोर्ट आहे, त्या ठिकाणी सकाळच्या सत्रात काम होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी संबंधित न्यायाधीशांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकाचवेळी अधिक केसेस घेता येणार नाही. प्रकरण चालवताना पक्षकार गैरहजर असल्यास त्याच्याविरोधात एकतर्फी आदेश देता येणार नाही, तसेच सक्तीचे आदेश काढून आरोपी-साक्षीदार यांना न्यायालयात बोलावता येणार नाही.
वकिलांसाठी असलेले बार रुम पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच काम नसताना वकिलांना न्यायालयात प्रवेशाची परवानगी नाही. कोणत्या कोर्टात कोणता खटला कधी लागणार, याची माहिती 24 तास अगोदर संबंधित वकील व पक्षकाराला पुरवण्यात येणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन कामकाजात काही बदल करण्याचेही अधिकार दिले आहेत. या संदर्भात प्रमुख न्यायाधीश वरिष्ठांशी सल्लामसलत करून निर्णय घेतील, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेत नमूद केले आहे.