राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय : राज्याच्या स्वंयपूर्णतेसाठी पंचायतींना सक्षम बनवणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
- विधानसभा अधिवेशन 25 जानेवारीपासून
- तब्बल 15 टक्के निधी जिल्हा पंचायतींना मिळणर
- विकासकामाच्या जाहिरातीसाठी 50 हजार रुपयांचा निधी
- लवकरच राज्यातील नगरपालिकांनाही सक्षम करणार
- मुख्यमंत्र्यांकडून सर्व 49 विजयी उमेदवारांचे अभिनंदन
- प्रियोळात पंपिंग व जलशुद्धीकरण प्रकल्पास मंजूरी
- शितोळे पाण्याच्या टाकीची क्षमता वाढविण्यास मान्यता
प्रतिनिधी / पणजी
राज्याला स्वयंपूर्णतेकडे नेण्याच्या सरकारच्या ध्येयपूर्तीत पंचायती व जिल्हा पंचायतींचेही योगदान असावे यासाठी त्यांना सर्व अधिकार आणि वाढीव निधी देण्यास सरकार कटीबद्ध असून त्यासंबंधी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दोन्ही स्थानिक स्वराज संस्थांना भरघोस वाढीव निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विधानसभेचे एका आठवडय़ाचे अधिवेशन 25 जानेवारीपासून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. कोरोनासंबंधी सर्व मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यानंतर महिन्याभराचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
खर्चात वाढ दिल्याने काम अधिक चांगले होणार
जिल्हा पंचायतींच्या विविध कामांसाठी असलेली खर्च मर्यादा वाढवून देण्यात आली असून त्यामुळे पंचायतींना जनतेपर्यंत चांगली सेवा पोहोचविण्यात मदत होईल. त्यांच्या कामाचीही गती वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
जिल्हा पंचायतींच्या खर्च मर्यादेत वाढ
राहणीमानात वाढ झाल्यामुळे खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
बैठकीचा भत्ता 10 हजार
भाडे, फर्निचर खरेदीसाठी 2 लाख
स्टेशनरी खरेदीसाठी 2 लाख
दुचाकी खरेदीसाठी 50 हजार
वकील खर्च (प्रति प्रकरण) 50 हजार
मदत, स्वयंसहाय्य गटांना मदत 800 रु
मजुरांसाठी प्रत्येकी 800 रुपये
विकासकामांच्या जाहिरातीसाठी 50 हजार
तब्बल 15 टक्के निधी जिल्हा पंचायतींना मिळणर
जिल्हा पंचायती सक्षम असाव्यात यासाठी पूर्वीपासूनच सरकारचे प्रयत्न होते. त्यासाठी त्यांना सर्व अधिकार आणि वाढीव निधीही देण्यात यावा, अशी मागणी होत होती. मंत्रीमंडळाने बुधवारी ती मान्य केली आहे. 15व्या वित्त आयोगाकडून नुकताच राज्यासाठी 75 कोटी निधी प्राप्त झाला आहे. त्यातील 15 टक्के निधी जिल्हा पंचायतींना मिळणार आहे.
… तरच ग्रामीण भागाचा विकास होईल : गुदिन्हो
राज्यातील जवळजवळ 70 टक्के भाग हा ग्रामीण असून तेथील राहणीमान उंचावण्यात स्वराज्य संस्थांचा मोलाचा वाटा असतो. त्यासाठी आधी त्या सक्षम झाल्या पाहिजेत, तरच ग्रामीण भागांचा विकास होईल, असे मत पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केले.
कामाच्या जाहिरातीसाठी 50 हजार रुपयांचा निधी
ग्राम पंचायती किंवा जिल्हा पंचायतींतर्फे करण्यात आलेल्या चांगल्या कामांची जाहिरात करण्यासाठीसुद्धा 50 हजार रुपयेपर्यंत निधी वाढवून देण्यात आला आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान सरकार आदर्शवत काम करत असून त्याची पोचपावती नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतून मिळाली आहे.
लवकरच नगरपालिकांनाही सक्षम करणार
जिल्हा पंचायतींना अधिक अधिकार व वाढीव निधी मिळाल्यामुळे त्यांच्याही कामाची गती वाढणार आहे. याच प्रकारे लवकरच पालिकांनाही सक्षम करण्यात येणार आहे, आमच्या या कार्यात केंद्र सरकारचेही संपूर्ण सहकार्य मिळत आहे, असे गुदिन्हो पुढे म्हणाले.
सर्व 49 विजयी उमेदवारांचे अभिनंदन
जिल्हा पंचायत निवडणुकीत भरघोस यश मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व गोमंतकीयांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व 49 विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. गोवा स्वयंपूर्ण करण्याची संकल्पना सत्यात आणण्यासाठी या उमेदवारांनी सहभागी व्हावे, कोणताही पक्षभेद न ठेवता सरकार सर्वांना एकसमान मदत, सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. आम्हाला ग्रामीण भागांचा विकास साधायचा आहे. त्या विकासावर भर देत असताना स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना पालिकातही राबवायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तामनार गोव्यासाठी अत्यावश्यक : मुख्यमंत्री
तामनार वीज प्रकल्प गोव्यासाठी अत्यावश्यक असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. गोवा मुक्तीदिन हा केवळ कार्यक्रम नसेल तर तो गोव्याच्या विकासाचा सोहळा आहे. त्यामुळे कुणीही त्यास विरोध न करता सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या अन्य काही निर्णयात प्रियोळ मतदारसंघातील सावईवेरे आणि केरी पंचायत क्षेत्रातील लोकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मुर्डीवाडा येथे पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम तसेच शितोळे सावईवेरे येथील टाकीची क्षमता वाढविणे या कामांसाठी कंत्राटदार निवड करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राष्ट्रपतींच्या भेटीस गालबोट लावू नये, चुकीचा संदेश देऊ नये
गोवा मुक्तीदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती प्रथमच गोव्यात येत आहेत. अशा या सोहळ्याची ही सुरुवात आहे. त्यानंतर वर्षभर कार्यक्रम होत राहणार आहेत. त्यात सर्व गोमंतकीयांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिक, सामान्यातील सामान्य कलाकार, शेतकरी, या सर्वांना सहभागी करून घेत कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यास विरोध न करता स्वतःही सहभागी व्हावे. गैरसमज पसरविण्याच्या नादात चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.