प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्यांना पाच वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांच्या पदाचा कार्यकाल पूर्ण झाला. सोमवारी प्रशासक म्हणून पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी स्वीकारला. त्यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी करत त्यांच्याकडे पदभार सोपवला. कारभार करताना प्रशासनाच्यावतीने चांगले सहकार्य मिळाल्यामुळे विकासात्मक योजना राबवता आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सकाळी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यमान सर्वच सदस्यांचा कार्यकाल संपला आहे.
पाच वर्षा कार्यकाल संपण्याच्या अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत समजलेच नाही. शेवटच्या दिवशी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच सर्वच पदाधिकाऱयांनी आपल्या गाडय़ा बांधकाम विभागाकडे जमा केल्या आहेत. तसेच सोमवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱयांच्या नावाच्या पाटय़ाही काढण्यात आल्या. तसेच त्यांचे स्वीय्य सहाय्यकही मुळ पदावर रुजू झाले आहेत. काही स्वीय्य सहाय्यकांनी लगेच रजा टाकली आहे.