प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांना दिल्ली येथे पर्यावरण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सातारा जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात आल्याने दिल्ली येथे जिल्हा परिषदेचा दोन वेळा सन्मान करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मोठी गावे घनकचरा व्यवस्थापन प्रकियेमध्ये स्वयंपूर्ण बनलेली आहेत. अजूनही 67 गावांमध्ये घनकचरा प्रकल्पाचे कामकाज करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव मागवून त्यांना तेथे प्रकल्पाकरता अनुदान देण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषद जे चांगले काम करत आहे. त्याची दखल घेवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांचा राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे वितरण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण कमिटीचे सदस्य अशोकराव गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी आठवले म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले हे खुप छान काम करतात. त्यांचा पर्यावरण सरंक्षणाचा उद्दात्त हेतू आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात सांडपाणी व्यवस्थापनाचे चांगले काम होत आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने त्यांच्याकडून चांगली कामे होत आहे. त्यांच्या कामाची ही पोहच पावती आहे, असे त्यांनी सांगितले.