प्रतिनिधी/कोल्हापूर
विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या ग्रामीण भारत बंदला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्यालय वगळता अन्य विभागातील कर्मचारी नियमीत कामावर होते. 12 हजार 255 पैकी 1572 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. 365 कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर होते. 10 हजार 318 कर्मचाऱयांनी संपाकडे पाठ फिरवली होती. ग्रामीण भारत बंदमध्ये जिल्हा परिषदेतील विविध संघटनांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यास कर्मचाऱयांतून थंडा प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान देशातील विविध संघटनांनी पुकारलेल्या ग्रामीण भारत बंद मध्ये सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करु असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर दिला होता. याची धास्ती घेवून कर्मचाऱयांनी कामावर हजर राहणे पसंत केले.
देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱया 268 संघटनांनी बुधवार 8 रोजी ग्रामीण भारत बंदची हाक दिली होती. या संपात सहकार, जिल्हा परिषदेतीली विविध संघटना सहभागी होणार आहेत. या संपास राजपत्रित अधिकारी महासंघानेही पाठिंबा जाहीर केला होता. जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियन, कर्मचारी महासंघ, लेखा कर्मचारी संघटना, लिपीकवर्गीय संघटना, आरोग्य कर्मचारी, वाहनचालक संघटना, ग्रामसेवक, कृषी आदी विभागातील कर्मचारी सहभागी होणार होत्या. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प होईल अशी भीती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकरी अधिकारी अमन मित्तल यांनी सर्व विभागातील कर्मचाऱयांना नोटीस बजावत शिस्तभंगासह बिनपगारी करण्याचा इशारा दिला होता.