काही कर्मचाऱयांना लागण झाल्याने उडाली खळबळ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ाचे ‘मिनी मंत्रालय’ मानल्या जाणाऱया जिल्हा परिषद भवनात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱयांत मोठी खळबळ उडाली आहे. काही विभागातील कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने अधिकारी, कर्मचारी पुरते धास्तावले गेलेत. धास्तावलेल्या कर्मचाऱयांना याबाबत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासंदर्भात गुरूवारी जि.प.अध्यक्ष, सीईओ यांची भेट घेऊन गाऱहाणे मांडले आहे.
जिल्हा परिषदेतून जिल्हय़ाच्या ग्रामीण भागाचा कारभार हाकला जातो. येथूनच ग्रामीण भागातील विकासात्मक योजना, विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीचे आदेश मार्गस्थ होत असतात. ग्रामीण भागातील विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत दरदिवशी मोठय़ा प्रमाणात जिल्हाभरातून विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी, जि.प.सदस्य, त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा गोतावळा तसेच अनेक नागरिक देखील येत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद भवन दरदिवशी गजबजलेले असते.
कोरोनामुळे जिल्हा परिषद भवनात अगदी सुरूवातीच्या लॉकडाऊनपासून विशेष खबरदारी घेतली जात होती. सुरूवातीच्या काळात अभ्यागतांशिवाय इतर कोणत्याही नागरिकांना जि.प.मध्ये येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. तर कर्मचाऱयांच्या कार्यालयातील मर्यादीत उपस्थिती राखण्यात येत होती. भवनात येणाऱयांसाठी दारापाशीच नोंद व कोरोना प्रतिबंध उपाय म्हणून सॅनिटायझर व थर्मामीटर गनचा अवलंब केला जात आहे. पण लॉकडाऊनमध्ये शिथीलता झाल्यानंतर कर्मचाऱयांची उपस्थिती वाढली. आज जिल्हाभरातून मोठया प्रमाणात या-ना त्या कामानिमित्त नागरिक व इतर लोकप्रतिनिधींची वर्दळही वाढलेली आहे.
अशा काळातच आता जिल्हा परिषद भवनात कोरोनाचा धक्कादायक शिरकाव झाला आहे. या भवनात विविध विभागात काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱयांत चांगलीच खळबळ माजली आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह येऊनही प्रशासनाकडून कर्मचाऱयांसाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात न आल्याने धास्तावलेल्या कर्मचाऱयांनी प्रशासनाकडे धाव घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड तसेच जि.प.अध्यक्ष रोहन बने यांची गुरूवारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी भेट घेतली.
जिल्हा परिषद भवनात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱयांबाबत चर्चा केली. त्यावेळी उर्वरित कर्मचाऱयांना त्याची लागण होऊ नये यासाठी घेण्यात येणाऱया दक्षतेबाबतही चर्चा केली. त्यावेळी लेखा कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष राजू जाधव, सचिव नितिन तांबे, मोहन कांबळे, जि.प.कर्मचारी महासंघाचे समीर इंदुलकर, नागरगोजे, आंबेरकर, वरक, विजय कुंभार, स्वप्नील मिरकर, निळकंठ साळवी, अनिल साळुंखे, आदी कर्मचारी उपस्थित होते.
या झालेल्या चर्चेवेळी कोरोनाचा प्रसार लक्षात घेता जि. प. कार्यालय 100 टक्के प्रशासकीय कामकाज बंद करणे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले. पण कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केलेल्या मागणीनुसार प्रशासकीय कामकाज रोटेशन पध्दतीने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उपस्थित पदाधिकाऱयांनी कर्मचाऱयांबाबतीत ग्नजे कर्मचारी 55 वर्ष आहेत, त्यांनी घरी राहून काम करण्याच्या सूचना दय़ाव्यात. जे कर्मचारी आजारग्रस्त आहेत, त्यांनाही सवलत देण्यात यावी. कार्यालयात कर्मचाऱयांना आवश्यकतेप्रमाणे रोटेशन पध्दतीने बोलावण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या चर्चेनंतर जि.प.प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद भवनाचा मुख्य गेट नागरिकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या गेटवरच टपाल स्विकारली जावीत अशीही मागणी करण्यात आली. तसेच प्रत्येक प्रशासकीय विभाग सॅनिटाईज करण्यात यावेत. जि.प.कार्यालयात होणारी जिल्हाभरातून विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींची वर्दळही बंद केली जावी अशी मागणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात तातडीने प्रत्येक खातेप्रमुखांशी चर्चा करण्यात येऊन सूचना करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास खातेप्रमुखांवर कारवाई
जिल्हा परिषद भवनात काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होताच सामान्य प्रशासनाच्यावतीने तातडीने बुधवारी 12 ऑगस्ट रोजी प्रत्येक खातेप्रमुखाला पत्र काढण्यात आले आहे. कोविड 19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांनी घेण्याच्या मागदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
काही विभागातील कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्य आजारी किंवा कोरोना बाधित असतानाही विभाग प्रमुखांना कळविण्याची दक्षात घेत नाहीत. तसेच काही विभागांमध्ये अद्याप पर्यंत अभ्यागतांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे कोरोना सामाजिक प्रार्दुभावाची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
प्रत्येक विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयातील अभ्यागतांच्या संख्येवर नियंत्रण ठेवावे. तसेच कर्मचाऱयांच्या बाबतीत योग्य ती दक्षता घ्यावी. त्याबाबत कोणी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असेल तर संबधितांवर कारवाई करण्यात यावी. याप्रमाणे कार्यालयात कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे कोटेकोरपणे पालन करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.