अधिकाऱयांच्या बंगल्याच्या दिशेने धुळ उडते म्हणून जि,परिषदेकडून उधळपट्टी : शिवतीर्थाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी
प्रतिनिधी /सातारा
सातारा जिल्हा परिषद मैदान हे एकमेव मैदान शहरवासीयांकरता मोकळे मैदान उरले होते. आता त्या ही मैदानाची नुतनीकरणाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधीची उधळण सुरू असून बांधकामचे अभियंता संजय उत्तुरे यांनी पदभार स्वीकारताच या कामाचा धडाका सुरू केलेला आहे. त्यांना विचारणा केली असता उत्तर मात्र मिळू शकले नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून अधिकाऱयांच्या बंगल्याच्या दिशेने धूळ उडते म्हणून नुतनीकरणाचा घाट घातला गेला आहे तर शिवतीर्थाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सातारा शहरात असलेली मोकळी मैदाने अलीकडच्या काळात बंदिस्त झाली आहेत. त्यामध्ये शुक्रवार पेठेतील कोटेश्वर मैदान, सातारा तालीम संघ मैदान आणि जिल्हा परिषद मैदान यांचा समावेश होतो. जिल्हा परिषद मैदान हे शहरातील खेळाडू, मॉर्निग वॉक करणाऱयांचे हक्काचे मैदान ओळखले जाते. या मैदानात दिवसभर रेलचेल असते. मात्र, मैदानावरील मातीची धूळ उडत असल्याच्या कारणास्तव निधी खर्च करून डागडुजी करण्याची खटपट जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सुरू आहे. याच मैदानात अनेक महोत्सव भरत असतात. अगदी ग्रंथ महोत्सव, नक्षत्र महोत्सव, मानींनी यात्रा, ज्योतिर्मय महोत्सव असे महोत्सव होतात. तसेच राजकीय सभा होतात. मैदानावर अनेक सामने ही होत असतात. त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळते. आता मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून निधी खर्च करण्याचा घाट घातला जात आहे. केवळ अधिकायांच्या बंगल्याच्या बाजूने धूळ उडते म्हणून हे काम केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे अभियंता संजय उतुरे यांनी पदभार स्वीकारताच कामाने वेग घेतला आहे. त्यांच्याबाबत बांधकाम विभागात असताना अनेक संघटनांनी तक्रार झाल्या होत्या. त्यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उत्तर मिळू शकले नाही. दरम्यान, सुरू असलेल्या नुतनीकरणांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची निगा राखली जाणार आहे का?, जिल्हा परिषद पदाधिकाऱयांचे दुर्लक्ष याकडे होत आहे.
शिवतीर्थाच्या कामामध्ये दिरंगाई पोवईनाक्यावरील शिवतीर्थ हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. मात्र, होत असलेले नुतनीकरण बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असून हे अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. ते काम प्राधान्याने व्हावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. त्याकडे प्राधान्य न देता केवळ जिल्हा परिषद अधिकाऱयांच्या बंगल्याच्या दिशेने धूळ उडते म्हणून मैदानाचे नुतनीकरण केले जात असल्याने शिवभक्त सातारकरामधून नाराजी व्यक्त होत आहे.