डॉ.दिलीपराव येळगावकर यांचा घणाघात
वार्ताहर/ मायणी
मायणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होणाया कामांना ग्रामपंचायतीची कोणतीही ना – हरकत परवानगी न घेता विरोधक काम करत असल्याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याकडे आम्ही तक्रार केली असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीवर राजकीय षडयंत्र रचून विरोधकांनी दिलेल्या तक्रारी वर तातडीने चौकशीची कार्यवाही करण्याची तत्परता दाखवणारी जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसची बटीक म्हणून सध्या कार्यरत असल्याचा घणाघात माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी केला आहे.
ते मायणी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी माजी उपसरपंच दादासाहेब कचरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मायणी ग्रामपंचायत मधील बोगस घरपट्टी संदर्भात केलेल्या तक्रारीने सीईओ यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशावरून माण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या समितीने मायणी ग्रामपंचायतीत चौकशी करून घरपट्टी पावत्या व सदर पावत्या पुस्तकांची शहानिशा केली होती. त्या अनुषंगाने माजी उपसरपंच दादासो कचरे यांनी प्रसिद्धी माध्यमात “मायणी ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.
यास उत्तर देताना ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ दिलीपराव येळगावकर यांनी जिल्हा परिषद कारभारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी सरपंच सचिन गुदगे,उपसरपंच जगन्नाथ भिसे,माजी उपसरपंच सुरज पाटील,आनंदा शेवाळे,कुमार देशमुख,अभिजित माळी,विजयकुमार कवडे,राजाराम कचरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायत कारभार सुरू असताना निवडणूका जवळ आल्या की अशा प्रकारची खोटी नाटी विधाने विरोधकांकडून केली जात आहेत. आता राष्ट्रवादीचे शासन राहिले नसून आता शासन बदलले आहे .याची जिल्हा परिषद प्रशासनाने नोंद घ्यावी.
सदर प्रकारणाबाबत पत्रकारांना माहिती देताना सरपंच सचिन गुदगे म्हणाले, दादासाहेब कचरे यांच्याकडे बोगस पावती संदर्भात दहा जणांनी तक्रार केली होती. त्यातील आठ तक्रारदार हे ते ज्या शिक्षण संस्थेत नोकरी करीत आहेत त्या संस्थेशी निगडित आहेत. तक्रार झालेल्या दहापैकी चार पावत्या या रीतसर ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद झाल्याचे आढळून आले आहे. तर दोन पावत्यांच्या मूळ प्रति तपासणी वेळी न देता त्यांच्या झेरॉक्स प्रति दाखविण्यात आल्या.
आमच्या कारकीर्दीत सन 2017 ते 2022 या कालावधीत आलेल्या सर्व ग्रामसेवकांनी बोगस पावती पुस्तके खरेदी केले नसल्याचे लेखी लिहून दिले आहे .त्यासाठी 2017 साली म्हणजे आमची सत्ता येण्यापूर्वी हे पुस्तक कोणी खरेदी केले की काय? हे 2002 सालापासून तपासून पहावे लागेल. आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी म्हणजे 2017 पूर्वी बोगस पावत्या व बोगस उतारे यासंदर्भात केलेल्या तक्रारी अद्यापी वडूज कोर्टात पेंडिंग असताना या घरपट्टी संदर्भात केलेल्या अलीकडील तक्रारी यावर तातडीने चौकशीचे आदेश देऊन ही चौकशी कशी करण्यात आली.हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
तसेच बोगस पावत्या संदर्भात ग्रामपंचायतीस कल्पना दिली होती या दादासाहेब कचरे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की ,बोगस पावत्या संदर्भात तपासणी आदेशाचे पत्र येईपर्यंत कोणत्याही तक्रारदाराने ग्रामपंचायतीस या संदर्भात कल्पना दिली नव्हती. तेव्हा असे म्हणण्यात त्यांचा हेतू काय आहे हे समजलं नाही.
जि .प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे नाव घेता सचिन गुदगे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या मार्फत अनेक कामे बोगस कागदपत्रांच्या आधारावर अथवा ग्राम पंचायतीच्या कागदपत्राशिवाय सुरू आहेत. विविध कामांना तांत्रिक प्रशासकीय मान्यता मिळत आहे. याची तपासणी करणे संदर्भात पत्रे दिली आहेत याची अद्यापही चौकशी का होत नाही हे आम्हास कळत नाही .
तपासणी पूर्ण होण्यापूर्वीच मायणी ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे दादासाहेब कचरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता कर हा नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊनच भरणे अपेक्षित असते. वैयक्तिक एखाद्या व्यक्तीकडे पैसे भरणे अपेक्षित नाही. बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने बोगस पावत्या व शिक्के वापरून हे कृत्य केले की काय हे तपासावे लागेल. त्यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर ग्रामपंचायत कडक कारवाई करेल. असे सरपंच सचिन गुदगे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात खुलासा केला आहे.