आजच्या जि.प. सर्वसाधारण सभेतच होणार निवडणूक प्रक्रिया, 9 समित्यांमधील 14 रिक्त पदांची होणार निवडणूक
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेतील 9 विषय समिती समित्यांमधील 14 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी मंगळवारी (24 ऑगस्ट) होणाऱया सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दुपारी 1 वाजता सर्वसाधारण सभा सुरु झाल्यानंतर सुरुवातीसच ही निवडणूक होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक होणार आहे. जि.प. प्रशासनाकडून याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
यामध्ये 1 ते 1.15 या वेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. 1.16 ते 1.25 दरम्यान माघारीची मुदत आहे. 1.26 ते 1.35 दरम्यान उमेदवारी अर्जाचे वाचन केले जाणार आहे. 2.15 वाजेपर्यत निवडणूक प्रक्रिया विषद केल्यानंतर 2.16 ते 4.15 या कालावधीत आवश्यक असल्यास मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. 67 सदस्यांपैकी प्रविण दौलत माने यांचे निधन झाले आहे. तर विजय भोजे यांना दिलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे 65 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सभापतींना मतदानाचा अधिकार आहे. त्यानुसार जि.प.प्रशासनाकडून 77 मतपत्रिका तयार केल्या असून प्रत्येक निवड समितीसाठी वेगळी मतपत्रिका तयार केली आहे.
विषय समिती आणि रिक्त पदांची संख्या
जिल्हा परिषदेमध्ये एकूण 9 विषय समित्या आहेत. यामध्ये स्थायी समितीमधील 2 पदे रिक्त आहेत. समाजकल्याणमधील 1, बांधकाममधील 1, शिक्षण 2, कृषी 1, पशुसंवर्धन 2, महिला, बालकल्याण 2, अर्थ 2 तर आरोग्य समितीमधील 1 असे नऊ समित्यांमधील 14 पदे रिक्त आहेत.
पदाधिकाऱयांनी घेतला आढावा
मंगळवारी होणाऱया सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व विषय समितीच्या सभापतींनी विभागप्रमुखांकडून आढावा घेतला. प्रत्येक विभागाकडून कोणत्या योजना राबविल्या, त्यासाठी किती निधी खर्च झाला, शिल्लक किती आहे, आगामी काळात कोणत्या योजना राबविणे आवश्यक आहे, त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे, आदी बाबींचा पदाधिकाऱयांनी सविस्तर आढावा घेतला.
जिह्यातील गंभीर प्रश्नांची सर्वसाधारण सभेत माहिती द्या
जिह्यातील अनेक गंभीर प्रश्नांची सर्वसाधारण सभेत माहिती द्यावी अशा मागणीचे पत्र सदस्य विजय भोजे यांनी सीईओ संजयसिंह चव्हाण यांना दिले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी येथील नळपाणीपुरवठा योजना 15 वर्षांपासून बंद आहेत. त्यासाठी जबाबदार कोण ? आणि त्यांच्यावर काय कारवाई केली ? अब्दुललाट ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगातून बोगस सहली काढल्या आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केली ? आरोग्य विभागाकडून मानधन तत्वावर डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दिले जाणारे मानधन कमी दिले जाते. याबाबत अद्याप समिती नियुक्त करून चौकशी केलेली नाही. याबाबत सद्यस्थिती काय आहे. याची माहिती देण्याची मागणी भोजे यांनी केली आहे.