प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात गेल्या दहा ते पंधरा दिवसात हजाराच्या पटीत वाढलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे भविष्यात परिस्थिती गंभीर होवू नये यासाठी लॉकडाऊन आवश्यक होता. थोडीफार शिथीलता मिळताच जिल्हय़ातील नागरिकांनी बेभानपणे लग्न कार्यासह सामाजिक समारंभात जो बेशिस्तपणा केला. बाजारपेठांमधून गर्दी केली, इतर जिल्हय़ात जाण्यास आरंभ केला मात्र त्याचा परिणाम बाधितांची संख्या वाढण्यात झालेला आहे. त्यामुळे ‘तरुण भारत’ने लॉकडाऊन गरज असल्याची भूमिका मांडली होती. तोच लॉकडाऊन शुक्रवारपासून सुरु झाला आणि सर्व शहरे, गावे चिडीचूप झाल्याने जिल्हा पुन्हा एकदा ‘लॉक’ झाला.
दि. 1 जुलै रोजी जिल्हय़ात बाधितांची संख्या 1108 होती तर 743 जण कोरोनामुक्त असल्याने ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 318 होती. तर बळींची संख्या 46 एवढी होती. मात्र त्यानंतर 50 ते 100 अशा संख्येने रुग्ण संख्या वाढत गेली. एकीकडे बाधितांचा वेग वाढत असताना कोरोनामुक्तीचा वेग कमी येत होता. तर याच काळात जिल्हय़ात ऍनलॉकची प्रक्रिया सुरु होती. मात्र, सार्वजनिक ठिकाणे, वाहन व्यवस्थांना परवानगी नव्हती. काही प्रमाणात ती दिली.
मग नागरिक देखील कोरोनाच्या भीतीवर मात करत बाजारपेठांत गर्दी करु लागले होते. अनेक ठिकाणी लग्न समारंभ साजरे होवू लागले होते. नेमके याच कालावधीत म्हणजे दि. 1 जुलै ते 17 जुलै लॉकडाऊन सुरु होईपर्यंत या कालावधीत एकूण बाधितांच्या संख्येत तब्बल 1 हजार 143 रुग्णांची वाढ झाली आहे. 1 हजार 179 कोरोनामुक्त झाले असले तरी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 890 झाली असल्याने आणि बळींची संख्या 74 झाली असल्याने गंभीर होणे आवश्यक होते. या कालावधीत जिल्हय़ातील सर्व गावांमध्ये कोरोना पोहोचला आहे तर दहा ते बारा गावात निर्माण होत असलेल्या संसर्ग साखळया गंभीर स्वरुप धारण करु लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन तर चार दिवसांचा अंशतः लॉकडाऊन जिल्हय़ात जाहीर करण्याची वेळ आली. शुक्रवारपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण जिल्हय़ाने अभूतपूर्व शांतता अनुभवली. परिस्थितीच्या गंभीरतेकडे दुर्लक्ष करुन पळणारी जिल्हावासियांची पावले घरातच थांबल्याने सर्व जिल्हय़ातील मोठय़ा शहरांसह, मोठय़ा गावांसह सगळा जिल्हा चिडीचूप झाल्याने नागरिकांना लॉकडाऊन यशस्वी करण्याचे मनावर घेतल्याचे दिसून आले.
रिमझिम पाऊसही दिवसभर पडत होता आणि गेले काही दिवस व दोन दिवसात अभूतपूर्व गर्दी अनुभवलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र उभ्या जिल्हय़ाने अनुभवले. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. यामध्ये बाधितांच्या संपर्कात येवून बाधित होण्याच्या रेटचे डब्लिंग झाले होते. लॉकडाऊनमुळे हा डब्लिंग रेट कमी होणार असून सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यास जिल्हा काही दिवसात कोरोनामुक्तीकडे वाटचाल करु शकतो.
दरम्यान, दिवसभरात जिल्हय़ात पोलीस दलाने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. राष्ट्रीय महामार्गासह जिल्हय़ाच्या सीमाही रोखून धरण्यात आल्या असून आता पोलीस प्रशासनावर लॉकडाऊनचा ताण वाढणार असून नागरिकांना मात्र घरात बसून कोरोनाला हरवण्यासाठी सहकार्याची भूमिका निभवून जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा निश्चिय करावा लागणार आहे.