प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात कोरोनाची संख्या पुन्हा वाढू लागली असून रत्नागिरी जिल्हय़ातही या आठवडय़ात काही अंश संख्या वाढली आहे. तसेच जिल्हय़ात कोरोना मृत्यूदर वाढल्याने आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हावासियांनी बेफीकीर न राहता योग्य ती काळजी आणि खबरदारी घेण्याच्या सूचना केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठकही घेतली असून प्रशासन चांगलेच अलर्ट झाले आहे.
मुंबई, पुणेतील कोरोना रूग्णांच्या संख्येत या आठवडय़ात चांगली वाढ झाली आहे तसेच महराष्ट्राच्या अनेक जिल्हय़ातही वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य मंत्र्यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत आरोग्य विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या असून कोणताही निष्काळजीपणा नको अन्यथा कारवाई केली जाईल असेही सांगितले. प्रत्येकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात आली असून नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहनदेखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
रत्नागिरीत गेल्या दोन तीन दिवसात रूग्णांची संख्या वाढत आहे. वारंवार आवाहन करूनदेखील नागरिक नियम पाळत नसल्याची बाब समोर येत असून बेफीकीर राहू नका असे प्रशासनाकडून सूचना करण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणे नियमावली कडक करण्याची वेळ आपल्यावर येवू नये यासाठी आधीच अलर्ट राहून योग्य ती खबरदारी घ्या असेही प्रशासनाने म्हटले आहे. कोणतेही लक्षणे वाटल्यास त्वरीत शासकीय रूग्णालयांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.