ऑनलाईन टीम / मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बहुतांश जिल्हा बँकांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या. परंतु आज सोमवार दिनांक ९ रोजी राज्य शासनाने या निवडणुकांची स्थगिती उठवली असून सर्व जिल्हा बँकांच्या मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश सहकार विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत.
गेली पावणे दोन वर्ष कोरोणाचे संकट असल्याने या कालावधीत जिल्हा बँकांच्या निवडणुका तब्बल ५ वेळा स्थगित झाल्या होत्या. मुदत संपून मोठा कालावधी उलटल्यानंतरही निवडणूक घेण्यात आली नसल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली होती. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला हिरवा कंदील दिला आहे. सरकारने आता अंतिम मतदार याद्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेची रणधुमाळी आता पुन्हा एकदा सुरू झाल्याने इच्छुकांची धांदल उडणार आहे.