काजू बी व्यापारी संघाचे रुपेश खाडये यांचे प्रसिद्धीपत्रक
प्रतिनिधी / कणकवली:
काजू बी किमान 120 रुपये किलो दराने खरेदी करण्यासंदर्भात जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी आवाहन केले आहे. आम्ही काजू व्यापारी, कारखानदार शेतकऱयांना दर देण्यास कमी पडलो, ही वस्तुस्थिती आहे. सावंत यांच्या भूमिकेबाबत आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो. मात्र, सोसायटय़ा व तालुका खरेदी-विक्री संघ यांनी स्वत: गुंतवणूक न करता, जिल्हा बँकेमार्फत भांडवल वापरून व प्रतिकिलो चार रुपयांपर्यंत कमिशन घेऊन खरेदी करावी. कारण गावागावातील लहान सोसायटी व तालुका खरेदी-विक्री संघ हे नुकसान सहन करू शकणार नाहीत, असे काजू बी व्यापारी संघाचे रुपेश खाडये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जिल्हा बँक अध्यक्षांनी आवाहन केल्यानुसार जर सोसायटी व तालुका खरेदी विक्री संघांनी 120 रुपये दराने काजू खरेदी केल्यास त्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज महामारीमुळे जागतिक बाजारात महामंदी आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काजू बीचे भाव 125 रुपये प्रति किलोवरून 60 रुपये प्रति किलो आले आहेत. तरीही आज बाजारात मोठय़ा प्रमाणात खरेदीदार नाहीत. मुंबई बाजारात लॉकडाऊनमुळे चार लाख काजूगर डब्बे (प्रत्येके दहा किलोचे) मागील वर्षीचे शिल्लक आहेत. नवीन येणारा आफ्रिकेतील काजू बी 60 रुपयाने मिळत असल्याने तो काजूगर 400 रुपये किलो दराने जगभर विक्री होणार आहे. मुंबई बाजार यावर्षी सप्टेंबरपर्यंत मंदीतच राहील, अशी स्थिती आहे. परिणामी काजूगर विक्री कमी होणार, त्यात मागील वषीचा काजू मंगलोर व केरळ येथे 15 लाख डब्बे तयार आहेत, तेही विक्रीअभावी शिल्लक आहेत, असे खाडय़े यांनी म्हटले आहे.
अशा स्थितीत सोसायटी व तालुका खरेदी-विक्री संघ यांनी जर जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन काजू बी खरेदी केली, तर व्याज व विक्री मूल्य असे किलो मागे 30 रुपये म्हणजे एक ट्रक मागे तीन लाख रुपयांचा फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे सोसायटी व तालुका खरेदी-विक्री संघांनी स्वतः खरेदी व गुंतवणूक न करता जिल्हा बँकेने खरेदी करावी तसेच भांडवल गुंतवणूक व काजू वाळवणीही करून किलोमागे चार रुपये कमिशन घ्यावे, असेही खाडये यांनी म्हटले आहे.
हे वर्ष संपूर्ण जगाला व्यापारासाठी, या शतकातील सर्वात धोकादायक आहे, म्हणून सोसायटी व तालुका खरेदी-विक्री संघ यांनी या बाबी ध्यानात घेऊन पुढील योग्य निर्णय घ्यावा. सोसायटीचे व खरेदी-विक्री संघाचे सभासद म्हणून आम्ही आवाहन करत आहोत, असेही खाडये यांनी म्हटले आहे.