प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा बँकेच्या राजकारणात आमदार विनय कोरे हे महाविकास आघाडीसोबतच राहणार आहेत. कोल्हापूर येथील जिल्हा बँकेच्या मुख्यालयामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, खासदार संजय मंडलिक व आमदार विनय कोरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत जिलहा बँकेच्या राजकारणात महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे विनय कोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदार पी.एन.पाटील व विनय कोरे यांच्याकडे सोपविण्यात आली.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची 10 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली होती. या बैठकीला आमदार विनय कोरे व शिवसेना नेते अनुपस्थित होते. त्यामुळे जागा वाटपासंदर्भातील चर्चा आणि महाविकास आघाडीच्या रचनेबाबत चर्चा अपुर्ण राहिली होती. त्यामुळे शनिवारी जिल्हा बँकेमध्ये पुन्हा बैठक झाली. या बैठकीत विकास गट वगळता इतर नऊ जागांचे वाटप आणि सर्वसमावेशक आघाडी होण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे ? याबाबत सविस्तर चर्चा झाली.
मनधरणीसाठी जबाबदारी निश्चित
जिल्हा बँकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेस व शिवसेना एकत्र आहेत. आमदार विनय कोरेही आघाडीत सोबत राहणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही त्यांच्याशी चर्चा करून सोबत घेण्यात येणार आहे. त्यानुसार माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून त्यांनी महाविकास आघाडीसोबत आणण्याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे. आमदार आवाडेंची मनधरणी करून त्यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्याची जबाबदारी आमदार पी.एन.पाटील व विनय कोरे यांच्यावर सोपवली आहे. तर जिह्यातील शिवसेनेच्या सर्व नेत्यांना एकत्र करण्याचे शिवधनुष्य खासदार संजय मंडलिक यांच्यावर सोपवले आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक आघाडीमध्येच
जिल्हा बँकेच्या राजकारणात हातकणंगले तालुक्यातून विकास संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी परिपूर्ण तयारी केली आहे. त्यांच्याकडे ठरावांचे बहुमत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. महाडिक यांचे स्वतंत्र अस्तित्व असले तरी त्यांना महाविकास आघाडीसोबतच रहावे लागणार आहे.
उच्च न्यायालयातील निकालानंतर पुन्हा बैठक
मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूरसह पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा बँकांसदर्भत पुढील आठवडÎात सुनावणी होणार आहे. निकाल होईपर्यंत निवडणूका न घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या निकालानंतरच नेत्यांची पुढील बैठक होणार आहे.