राज्यात नगर पंचायतीच्या आणि जिल्हा बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाही लागणार आहेत. कोरोना महामारीतील पावणेदोन वर्षांनतर होत असलेल्या या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या सर्व निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये अग्रगण्य बँक म्हणून ज्या बँकेचे नाव घेतले जाते, त्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने जिल्हा बँकेची चुरशीची निवडणूक पाहायला मिळणार आहे.
कोरोनाच्या सावटाखाली पावणेदोन वर्षे गेली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कोरोना संकटातून सावरण्याचा सर्वांचाच प्रयत्न सुरू आहे. त्यातच ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सारे जग पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली आहे. या सर्व अशा वातावरणामध्येच कोकणात नगर पंचायत आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्हय़ातील मंडणगड व दापोली आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वैभववाडी, देवगड, कुडाळ व दोडामार्ग अशा कोकणातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. महाराष्ट्रात सत्तास्थानी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांच्या महाविकास आघाडीमार्फत स्वायत्त संस्थांच्या निवडणुकाही एकत्रित लढविणार असे सांगितले जात आहे. तरीही काँग्रेस पक्षाने या निवडणुका स्वतंत्रपणे लढविणार, असे जाहीर केले आहे.
शिवसेना या निवडणुकीत आपल्यालाच अधिकच्या जागा वाटय़ाला याव्यात यासाठी आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका फार सावध आहे. मात्र निर्णायक आपणच असू, अशी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपने मात्र महाविकास आघाडीविरोधात कडवी लढत देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची ताकद वाढल्याचे या निवडणुकांमधून दाखविण्यासाठी निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. मात्र आता ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणुकीत काय बदल घडतात, हे पाहावे लागेल.
कोकणात होत असलेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकांपेक्षा जिल्हा बँकेची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. सहकारातील निवडणुका या त्यांच्या ठराविक असणाऱया मतदारसंघांतून होत असतात. पूर्वांपार मतदारसंघ असतात. त्यामुळे आजवर या निवडणुका बिनविरोध होत राहिल्या. काही अपवादात्मकवेळा निवडणूकही झाली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याच पॅनेलला यश मिळाले. रत्नागिरीचे आमदार तथा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँकेवर वर्चस्व राखण्यात यश मिळवले. मात्र बँक निवडणुकीत भाजपचे दोन संचालक निवडून येत बँकेत चंचूप्रवेश केला. त्यामुळे सगळं काही एकतर्फी होणार नाही, याचे संकेत दिले गेले आहेत.
मात्र सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून ही बँक निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकही छोटीसी बँक असली, तरी या बँकेने गरुडभरारी घेत संपूर्ण राज्यात अग्रगण्य बँक म्हणून नाव कमावले आहे. आदर्श बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. त्यामुळे या बँकेवर वर्चस्व मिळवण्याची लढाई सुरु झाली आहे.
तब्बल 2400 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या आणि सहकारात अग्रगण्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 30 डिसेंबरला होत आहे. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवली जात नसली, तरी पक्षीय ताकद दोन्ही बाजूकडून पणाला लावली जाते. यावेळीही तशीच ताकद भाजप विरुद्ध महाविकास आघाडीकडून लावली जात आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा नारायण राणे यांना सोडून शिवसेना प्रवेश. राणे यांचा भाजप प्रवेश. त्यानंतर त्यांना मिळालेले केंद्रीय मंत्रीपद, तर दुसरीकडे राज्यात शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता. त्यामुळे दोन्हीकडून राजकीय ताकद पणाला लावली जाणार असल्याने जिल्हा बँक निवडणुकीत ‘काँटे की टक्कर’ होणार हे निश्चित आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक 5 मे 2015 रोजी झाली होती. मे 2020 मध्ये जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. मात्र मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून संचालक मंडळाला मुदतवाढ दिली जाऊन तब्बल सहावेळा स्थगिती देऊन मुदतवाढ मिळत गेली. त्यानंतर 30 डिसेंबरला जिल्हा बँकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मागील निवडणुकीची पार्श्वभूमी पाहिली, तर शिवसेना-भाजप एकत्र होती. त्यावेळी त्यांना 19 पैकी चार जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस, राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या होत्या. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत बिनविरोध निवडून आले होते. मात्र गेल्या साडेसहा वर्षांत राजकीय स्थित्यंतरे होत गेली. शिवसेना-भाजप युती तुटली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली आहे. राणेंचे कट्टर समर्थक सतीश सावंत यांनी राणेंपासून फारकत घेतली आहे. राणे काँग्रेसमध्ये असताना ज्या जागा मिळवलेल्या, त्यापैकी एक दोन संचालक वगळता बाकीचे काँग्रेसमध्ये राहिलेत. त्यामुळे जिल्हा बँकेवर सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. आता शिवसेना साथीला मिळाल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार आहे.
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत राणेंसोबत असताना अध्यक्ष झाले आणि साथ सोडली. तरीही ते अध्यक्ष राहिले. आताची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमार्फत लढविली जात आहे. पुन्हा एकदा सतीश सावंत विरुद्ध राणे अशी निवडणूक रंगणार आहे. जिल्हा बँक निवडणूक ही सहकारातील निवडणूक असली, तरी या निवडणूक निकालाचे परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही दिसून येतील.
संदीप गावडे