कोरोना संसर्गात कर्तव्य टाळले : अहवालानंतर केली कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून नागरिक आरोग्य विभागाच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकून हे संकट कधी टळेल याची वाट पहात आहेत. मात्र, याच बिकट काळात सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील चार डॉक्टरच कामावरच हजर राहिले नाहीत. या कर्तव्यात कसूर करणाऱया चौघांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निलंबित केले आहे.
जिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेल्या डॉ. विशाल जाधव, डॉ. प्रज्ञा भोसले-जाधव, डॉ. अर्चना खाडे, डॉ. उज्ज्वला नाईक अशी निलंबित केलेल्या डॉक्टर्सची नावे आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस अवितरपणे काम करत आहेत. मात्र हे चौघे डॉक्टर्स कोरोना संसर्गापूर्वीपासून तसेच कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून कामावरच हजर झालेले नाहीत. त्यांच्या बेशिस्तीबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या मात्र त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडून काहीच कारवाई केली जात नव्हती.
शेवटी वैद्यकीय अधिकाऱयांनी याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे याबाबत गाऱहाणे मांडल्यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लगेच त्यांचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी अहवाल सादर केल्यानंतर सिंह यांनी त्या चारही डॉक्टर्संना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केले असून त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात शिस्त वाढीस लागेल, अशा प्रतिक्रियाही यानंतर व्यक्त झाल्या आहेत.