प्रतिनिधी/ सातारा
गेले वर्ष हे कोरोना संसर्गामध्ये गेले. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात देखिल संपूर्ण प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा ही कोरोना संसर्गित व्यक्तींच्या उपचारावरच लक्ष केंद्रीत करून होती. त्यामुळे जिल्हा रूग्णालयामध्ये अन्य आजारांच्या रूग्णांवरील उपचाराकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत होते. त्यामध्ये मानसोपचार रूग्णांचाही समावेश होता. पण आत्ता अखेरीस जिल्हा शासकीय रूग्णालयाला कायमस्वरूपी मानसोपचार तज्ञ उपलब्ध झाला आहे.
त्यामळे गेल्या अनेक महिन्यांपासून मानसोपचार रूग्णांची होणारी परवड आता थांबणार आहे. सध्या लॉकडाऊन व कोरोना महामारीच्या रोगाने कित्तेक नागरीक हे घरातच बंदीस्त होते. विशेषतः कित्त्येक ज्येष्ठ नागरिक हे अध्याप मुक्तपणे घराबाहेर पडत नाही. त्यामुळे बऱयाच ज्येष्ठ नागरिकांची मानसिक स्थिती ही खालावली आहे. पण जिल्हा रूग्णालयात यासंबंधी मानसोपचार तज्ञ उपलब्ध नसल्याने त्यांची परवड होत होती.
कित्तेक रूग्णांना पुण्या सारख्या ठिकाणी जाऊन याबाबतचे उपचार करून घ्यावे लागत होते. पण आत्ता मानसोपचार तज्ञांची नियुक्ती जिल्हा रूग्णालयात करण्यात आल्याने परिस्थिती काहीशी बदलणार आहे, व रूग्णांची होणारी परवड थांबणार आहे.