जिल्हा बँक कोणाच्या हातात जाईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही
ऑनलाईन टीम / कोल्हापूर
महाराष्ट्रासह सबंध जिल्ह्याचे लक्ष लागुन राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानाला आज सकाळी 8 वाजल्यापासून सूरुवात झाली. या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्याचे पुढचे राजकारण कसे असेल ? यावर बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांचा महादेवराव महाडिक यांनी चिमटा काढला. जिल्ह्याचे राजकारण ठरवणारे रति – महारती मुंबईत बसले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारे महाडिक कोण ? जशी परिस्थिती आहे तसा निर्णय घेतला जाईल असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याचे राजकारण योग्य वळणावर आहे. असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी लगावला. केडीसी बँकेतील राष्ट्रवादी – काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या बेबनावावरून त्यांनी हा टोला लगावला आहे. जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ते आज राजारामपुरीतील वि. स. खांडेकर शाळेमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.पुढे माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले , मतदान करण्याचे कर्तव्य माझे आहे. कौल देण्याचं काम त्यांच्या हातात आहे. ही लोकशाही आहे कोणाला काय करायचं ? हे ज्याचे त्याने ठरवावे, त्यावर महाडिक काय बोलणार, असे महाडिक म्हणाले.
जिल्हा बँक ही अयोग्य व्यक्तीच्या हातात कधीच नव्हती. ती योग्य व्यक्तीच्या हातात आहे. गेले पस्तीस वर्षे मी जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय आहे. असे महाडिक म्हणाले. तसेच जिल्हा बँक ही योग्य व्यक्तीच्या हातात जाईल, असं म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी अप्रत्यक्षपणे पसंती दिली आहे.