माजी महापौर सुरेश पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / सांगली
समाजकारण, शेती, राजकारण, सहकार, उद्योग, क्रीडा, व्यापार आणि शिक्षण या क्षेत्रात गेल्या ६० वर्षात सांगली जिल्ह्याने गतीने प्रगती करत राज्यात वेगळी ओळख निर्माण केली. सांगली जिल्हा स्थापन होऊन नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली. येत्या २०३५ साली जिल्हा ७५ वर्षे पूर्ण करणार आहे. पुढील १५ वर्षानंतर जिल्हा कसा असावा त्यासाठी सांगली जिल्ह्याचा मास्टरप्लॅन तयार करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाकरिता पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कल्पक नेतृत्व व मुख्य मार्गदर्शनाखाली तसेच कृषी व अल्पसंख्याक राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सहकार्याने तालुक्याच्या विविध क्षेत्रातील तज्ञ प्रतिनिधीच्या समावेशाने ‘व्हिजन सांगली@75’ या फोरमची स्थापना करण्यात आल्याची माहिती फोरमचे मुख्य समन्वयक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले पुढे म्हणाले कृषी, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, सहकार या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेऊन प्लॅन होणे गरजेचे आहे. त्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. सर्व समाज घटकांच्या अपेक्षा विचारात घेऊन तसेच समाजाची खरी गरज ओळखून जिल्हा नियोजन समितीमार्फत, PWC, मेकेन्झी, Cricl अशा नामवंत कंपन्यांकडून प्लॅन तयार करुन घेतला तर जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार होईल व नियोजन करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल. ते म्हणाले सदर मास्टर प्लॅन हा १५ वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असून दरवर्षी काय करायचे आहे याचे व्यापक नियोजन केले जाईल व त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.