प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. असे असताना ही सातारा जिल्ह्यातील वन विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला एक अधिकारी चक्क पुण्यावरून येजा करत आहे. ही प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक असून जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार असा सवाल सामाजिक संघटना उपस्थित करू लागल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील 35 जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही आपल्या फेसबुक लाईव्हमधून जनतेशी सवांद साधताना हेच सांगितले. परंतु जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असतील तर येजा होतीच कशी?, गुन्हेगारीचा शिक्का असलेले वाधवान हे थंड हवेत फिरायला आलेच कसे?,जरी त्याला पत्र देणाऱ्या सचिवाला सक्तीच्या रजेवर पाठवले तरी जिल्ह्याच्या खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यातील सीमा ओलांडून गाड्या पोहचल्या होत्या. इकडे बँक अधिकारी आपल्या पत्नीला घेऊन साताऱ्यात येत असताना पोलिसांनी कारवाई केली जाते. अशा कारवाया होत असताना मात्र सातारा वनविभागामध्ये सध्या एक वरिष्ठ अधिकारी पुण्यावरून येजा करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली आहे. पोलिसांनी त्या अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा अन उचित कारवाई करावी अशी मागणी होत असून नेमकी जिल्हाधिकारी यांच्याकडून काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
चंद्रपुरात झाले आहे निलंबन
सातारा ते पुणे असा प्रवास करणारा एक अधिकारी असून तसाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला होता.फरक एवढाच की अधिकारी जिल्हा परिषदेचा होता.त्यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी निलंबनाची कारवाई केली. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा ही दाखल केला.तशी कारवाई जिल्ह्याच्या सीमा ओलांडणाऱ्या वन विभागाच्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?,असा सवाल उपस्थित होत आहे.