प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना दीपावली आली. दीपावलीत सलग सुट्टय़ा व दीपावलीमुळे लसीकरणाची गती मंदावलेली होती. मात्र, गत सोमवारपासून दैनंदिन 10 हजारांच्या पुढे लसीकरण होवू लागले असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्येने 30 लाखांचा आकडा पार केला आहे. लसीकरणात जिल्हय़ाचा राज्यात पाचवा क्रमांक आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली असून नोव्हेंबर अखेर 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.
दीपावलीत आलेल्या सलग सुट्टयांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र सुट्टय़ा संपताच जिल्ह्यात लसीकरणाला पुन्हा गती आली आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 30 लाख 3 हजार 86 एवढी झालीय. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 98 हजार 41 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 10 लाख 5 हजार 45 एवढी झालीय.
जिल्हय़ात कोरोना संसर्ग आटोक्यात आला दैनंदिन मोठया संख्येने होणारी बाधित वाढ थांबलीय. लसीकरणाने सामुहिक प्रतिकार शक्ती वाढत असल्याने प्रशासनाकडून लस घेण्याचे आवाहन केले जात असून ज्यांचा दुसरा डोस आला आहे त्यांनी देखील लस घेवून लसीकरण मोहिमेस सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.