वेंगुर्ला/प्रतिनिधी-
5 जून 2020 रोजी च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचे कवच संपल्यानंतर विमा कंपनीने देय रक्कम 45 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात परस्पर जमा करावयाची तरतूद आहे. मात्र नव्वद दिवसांचा कालावधी उलटून याबाबत विमा कंपनीने कोणत्याही प्रकारची उचल घेतलेली नाही. शिवाय याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाही. जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा च्या प्रतीक्षेत असून ही भरपाई गणेश चतुर्थी पर्यंत न मिळाल्यास विमा कंपनी व शासनाच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
मठ येथील आंबा बागायतदार शेतकरी ललित कुमार ठाकुर म्हणाले, विमा उतरवताना शेतकऱ्यांना तरतुदीशी बंधने घालण्यात येतात मग विमा कंपनीला देय रक्कम देण्यासाठी बंधन का नाही? त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? हे समजत नाही. शासन निर्णय 28 सप्टेंबर 2018 मधील तरतुदी, त्यानंतर शासन निर्णय 31 ऑगस्ट 2019 मधील तरतुदी व आता शासन निर्णय 5 जून 2020 मधील तरतुदी यांचा सखोल अभ्यास केल्यास असे समजते की सर्वच्या सर्व तरतुदी या कंपनीच्या हिताच्या दृष्टीने केले आहेत. त्यात कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे हित जोपासले गेले नाही.
हेक्टरी सहा हजार विमा हप्ता वाढवून तो सात हजारावर नेऊन ठेवला. आंबा पिकाची मुदत 31 मे वरून 15 मे वर आणून ठेवली. त्यामुळे 16 मे 2019 रोजी झालेले तोकते वादळ, अतिवृष्टी यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र विमा उतरवलेला असतानाही शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही आहे याला जबाबदार कोण? त्यामुळे गणेश चतुर्थीपर्यंत विमा कंपनीकडून विमा पोटी मिळणारी रक्कम न मिळाल्यास विमा कंपनी व शासनाच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व शेतकरी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.