अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 26 मे 2021, सकाळी 10.45
● गत 24 तासात 2156 नवे रूग्ण वाढले ● एकूण रूग्णवाढ 1 लाख 55 हजारांच्यापुढे ● मृृत्यूदरही कमी व्हायला हवा ● एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात पॉझिटिव्हिटी कमी ● पहिल्या दिवशी प्रतिसाद ● आज कडक लॉकडाऊनचा दुसरा दिवस
सातारा / प्रतिनिधी :
कोरोना रूग्णवाढीच्या वेगाने सातारा जिल्ह्याला राज्याच्या पहिल्या दोन क्रमांकात नेऊन ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करायची वेळ जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींवर आली. आज 26 मे कडक लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पोलिसांसह नगरपालिका, ग्रामपंचायतींनी एकीची वज्रमुठ दाखवत लॉकडाऊन कडक पाळला. अपवाद वगळता मोठी कारवाई कुठेही झाली नाही. कडक लॉकडाऊनला जिल्हावासियांनी जसा प्रतिसाद दिला आणि पोलीस,महसूल प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी जसे काटेकोर नियोजन केले तसेच पुढील आठवडाभर करण्याची गरज आहे. तरच आणि तरच कोरोना रूग्णवाढीची साखळी तुटणे शक्य आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2156 रूग्णवाढ झाली आहे. रूग्णवाढीचा हा आकडा लक्षात घेता कडक लॉकडाऊनचे गांभिर्य सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
संस्थात्मक विलगीकरण करा पण…
जिल्ह्यात गृहविलिगीकरणात असलेल्या काही रूग्णांनी नियमांना पायदळी तुडवल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने दोन हजारावर गेला. आता प्रशासनाकडून संस्थात्मक विलिगीकरणावर भर दिला जाणार आहे. पण रूग्णवाढीचा आकडा पाहता संस्थात्मक विलिगीकरणाच्या सुविधेवर तत्काळ लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. या सुविधा उभारताना जिल्हा प्रशासन, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचा समन्वय गरजेचा आहे. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात 144 नवे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. हा वेग लक्षात घेऊन संस्थात्मक विलिगीकरणाचे नियोजन व्हायला हवे अन्यथा रूग्णांचे अवस्था आगीतून उठून फोफाट्यात पडल्यासारखी होऊ नये अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
त्यामुळेच कडक लॉकडाऊनचा उपाय
जिल्ह्यात 21234 उपचारार्थ रूग्ण आहेत. 3373 रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात 9 मे ते 15 मे या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 33 टक्के होता. 16 ते 22 मे पर्यंतची पॉझिटिव्हिटी 27 टक्के होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याचा म्हणजे 27 एप्रिल ते 4 मे पर्यंतचा विचार केला तर त्यावेळची पॉझिटिव्हिटी 37 टक्के होती. 5 मे नंतरच्या दोन आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट काहीसा कमी मंदावला. मात्र प्रशासनाला अपेक्षित होता तेवढा पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला नाही. या उलट पॉझिटिव्हीटी रेट वाढल्याने राज्यात जिल्हा नंबर दोन या क्रमांकावर गेला. गेल्या पंधरा दिवसातील लॉकडाऊनचा आवश्यक तेवढा परिणाम रूग्ण मंदावण्यावर झाला नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊनची वेळ आली. आता या कडक लॉकडाऊनचे परिणाम जिल्हावासियांना दिलासा देणारे असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागासाठी हा निधी उपयोगात आणण्याची गरज
ग्रामीण भागात कोरोना व म्युकर मायकोसिस विरूद्ध लढण्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्चायला काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंजूरी दिली. यामुळे ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम होणार असल्याचा दावा केला जातोय. या निधीतून ग्रामपातळीवर किमान ३० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. जिल्हा गौण खनिज विकासनिधीतून आरोग्यासाठी ३० टक्के निधी खर्च करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना आज तात्काळ देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील ग्रामिण भागात या निधीचा उपयोग करून कोरोना सेंटर उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 7,11,736, एकूण बाधित 1,55,662, एकूण कोरोनामुक्त 1,30,920, एकूण बळी 3,489, एकूण उपचारार्थ 21234
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 2156, मुक्त 2,147, बळी 33