प्रतिनिधी / सातारा :
प्रत्येकाच्या दैनंदिन जिवनातील आहारातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे भात. हा भात बनविण्यासाठीचे तांदूळ हे आपल्याला शक्यतो पांढऱ्या किंवा पिवळसर रंगात उपलब्ध होतात. पण यंदा कृषी विभागाने तर चक्क निळय़ा भाताची लागवड केली आहे. सातारा जिल्हय़ात हा पहिल्यांदाच निळय़ा भाताची लागवड करण्यात आली आहे. सध्या खरीप हंगामाला सुगीचे दिवस असुन याचेच औचित्य साधुन आरोग्यासाठी गुणकारी असणाऱ्या अशा या निळ्या भाताची लागवड करण्यात आली आहे.
कृषी विभागातर्फे हा उपक्रम महाबळेश्वर तालुक्यातील बिरमणी येथे राबविण्यात आला आहे. येथील शेतकरी प्रकाश मोरे यांच्या शेतात ही लागवड करण्यात आली आहे. यावेळी कृषी विभागाचे उपसंचालक, साताराचे विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी, वाई चंद्रकांत गोरड, कृषी सहाय्यक दिपक बोर्डे यांच्या हस्ते निळ्या वाणाची पेरणी करण्यात आली. या भाताचे वाण इंडोनेशियामधील असुन आसामच्या काही शेतकऱ्यांनी या निळ्या भाताच्या वाणाची लागवड केली होती. 2018 साली अहमदनगर जिल्ह्यातील अकोळे तालुक्यातील शेतकऱ्याने 3 किलो बियाणे आणले होते, व त्यापासून 2 वर्षात 14 क्विंटल बियाणे उत्पादित केले. त्यातील यावर्षातील बियाणांमधील 50 किलो बियाणे हे महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत.
या वाणाची साळ काळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे (काळे) व लांबट आहेत. शिजवल्यावर भात ही जांभळा होतो. तसेच त्याला दरही अधिक मिळतो. त्यामुळे सातारा तालुक्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना ही फायदेशीर ठरेल, कारण या भाताला इतर भागातुन मागणी ही अधिक आहे. एक नाविन्यपूर्ण बाब किंवा प्रयोग म्हणून कृषी विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून येथील कुंभरोशी, भोसे, पांगारी, दानवली आदी भागातील शेतकरी ही या निळ्या वाणाची लागवड आपल्या शेतात करणार आहेत.
या भाताच्या पेरणीप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुनिल साळुंखे, कृषी अधिकारी दळवी, मंडल कृषी अधिकारी भुपाल बुधावले, कृषी सहाय्यक रोहन निगडे, रणजित शिंदे यांच्यासह वामन मोरे, प्रदिप मोरे, गणपती मोरे, गोपीचंद घाडगे, सुभाष मोरे, सुरेंद्र मोरे, शरद मोरे, मंगला मोरे आदी शेतकरी उपस्थित होते.
आरोग्यासाठी गुणकारी
हा भात आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असा आहे, कारण यामध्ये प्रोटीन 12.53 टक्के, तर कॅल्शीयम 40.68 एमजी/100 जीएम आयर्न 28.38एमजी/100 जीएम व झिंक 9.46 एमजी/100 जीएम याप्रमाणे आहे. यामुळे शरीराची होणारी झिज भरून निघते. तसेच साखरेचे प्रमाणे हे 0.5 पेक्षा ही कमी आहे. त्यामुळे ज्यांना डायबेटीज असणाऱया रूग्णांसाठी इतर भातांपेक्षा हा भात फायदेशीर ठरतो. कारण शक्यतो डायबेटीज रूग्णांना वैद्यांच्या सल्यानुसार भात खाण्याचे टाळण्यास सांगण्यात येते. पण हा निळा भात मात्र त्यांना खाता येऊ शकतो.
महाबळेश्वर कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम
लॉकडाऊन काळात ही यंदा कृषी विभागाने स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यापुर्वी ही कृषी विभागातर्फे महाबळेश्वर येथे पहिल्यांदाच केशरचे उत्पादन घेण्यात आले होते. हा प्रयोग ही यशस्वी ठरला होता. तसेच आरोग्यासाठी गुणकारी असणाऱया काळय़ा गव्हाचे उत्पादन ही घेण्यात आले होते.