प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना महामारीचे मोठे संकट दिसत नसतानाही सरकारने घोषीत केलेल्या रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत कडक निर्बंध लादले आहेत. उष्मा वाढत असताना सर्व सामान्य नागरीक खरेदीसाठी संध्याकाळीच बाहेर पडतात परंतु रात्री 8 वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी आपल्या प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे.
यातून समाजातील सर्वच घटकातील असंतोष वाढत आहे. तरी लॉकडाऊन मागे घ्यावा अशी मागणी भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले. कोल्हापूर शहरातील छोटे व्यवसायीक, फेरीवाले यांची व्यवसायाबद्दल असलेली भूमिका स्पष्ट केली. तसेच अधीच भ्रष्टाचार, बलात्कार, खंडणी वसुली, खून-मारामाया अशा अनेक बदनामीच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे राज्य सरकार दलदलीमध्ये रुतत चालले असताना व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या रोषाला सामोरे जात असताना या गोष्टी पासून लक्ष विचलित करण्यासाठी संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत.
लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य नागरीक, छोटे व्यापारी, फेरीवाले, छोटे-मोठे उद्योग धंदे पुन्हा एकदा उभारी घेत असताना लॉकडाऊनचा आतातायीपणाचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचे आहे तसेच महाराष्ट्रातील काही जिह्यांमध्ये कोरोना संकट वाढत असताना तेथे कडक निर्बध लावण्या ऐवजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यालाच लॉकडाऊनचे चटके सोसण्याचे महापाप सरकार करत आहे. असा आरोप निवेदनात केला आहे.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष विक्रम राठोड, उद्योग आघाडी अध्यक्ष कालिदास बोरकर, नजीर देसाई, अशोक लोहार, महिला अध्यक्षा गायत्री राऊत आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.