अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 7 सप्टेंबर 2021, सकाळी 11.15
● सोमवारच्या अहवालाचाही दिलासा
● एकूण 12,501 जणांची तपासणी
● 574 जणांची कोरोनावर मात
● फक्त एक बाधिताचा मृत्यू
● लसीकरण साडे 19 लाखाच्या पार
● सप्टेंबरचा आरंभ दिलासादायक
सातारा / प्रतिनिधी :
ऑगस्टच्या मध्यापासून जिल्ह्यातील बाधीत वाढीचा वेग मंद होऊ लागला. मात्र तरीदेखील तीन अंकी संख्येने पाचशे-सहाशे आठशेच्या घरात वाढ सुरू होती. ऑगस्टच्या अखेरीस वेग चांगला मंदावू लागला आणि सप्टेंबरचा आरंभ जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरू लागला आहे. जिल्ह्यात तीन चार दिवसात बाधित वाढीचा आलेख चारशेच्या खाली घसरला असून शुक्रवारी 351, रविवारी 311 आणि सोमवारच्या अहवालात 360 जणांचा अहवाल बाधित आला आहे. मात्र ही वाढ देखील मुंबईच्या आकडेवारीच्या बरोबरीनेच सुरू आहे. त्यामुळे बाधित वाढीचा आलेख शून्यावर आणण्यासाठी प्रशासन आणि जिल्हावासियांना अजून प्रयत्न करावे लागणार आहेत.
सोमवारी अहवालात 360 बाधित
प्रशासनाकडून सोमवारी रात्री देण्यात आलेल्या अहवालानुसार एकूण 12 हजार 501 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे यामध्ये पॉझिटिव्हिटीचा दर चांगलाच खाली राहिला असून फक्त 360 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 2.97 वर स्थिर आहे. तर बाधितांच्या मृत्यूची संख्या ही रोडावल्याने त्याचा मोठा दिलासा या स्थितीमध्ये नागरिकांना लाभला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी होऊ लागली आहे.
फलटण, सातारा तालुक्यांत लक्ष द्या
बाधित वाढ मंदावत असली तरी फलटणमध्ये शहर व तालुक्यात सातत्याने वाढत असलेली बाधितांचे आकडे चिंताजनक आहेत. हॉटस्पॉट सातारा तालुक्यात खूप दिवसांनी दोन अंकी संख्या वर वाढ दिसून येत आहे. मात्र तरीदेखील फलटण आणि सातारा तालुक्यात प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कराडकरांना चांगलाच दिलासा मिळू लागला असून कराड तालुक्यातील वाढ दोन अंकावर आलेली आहे. तर जावली, पाटण, वाई, महाबळेश्वर येथील बाधित वाढ देखील एक अंकावर येत असून रविवारच्या अहवालात तर जावली तालुका निरंक राहील याचा मोठा दिलासा मिळालेला होता.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 18,56,782
एकूण बाधित 2,42,306
घरी सोडण्यात आलेले 2,28,917
मृत्यू 6,061
उपचारार्थ रुग्ण 10,743
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 308
मुक्त 574
मृत्यू 01