शासन आदेशाचे पालन करणे बंधनकारक
कोल्हापूर / प्रतिनिधी
ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दहा दिवसापासून शाळा बंद केल्या आहेत. परंतू शाळा बंदला इंग्लिश मिडियम स्कूल असोशिएशन यांच्यासह अन्य शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध झाला. त्यामुळे राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या 4363 शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. परंतू शासनाचे लेखी आदेश दिल्यानंतरच जिल्हा परिषद आणि महापालिका शिक्षण विभागाकडून शाळांना सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.
कोरोना काळात बंद असलेल्या शाळा तब्बल पावनेदोन वर्षानंतर 4 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या, या शाळा कशातरी तीन महिने सुरू राहिल्या. तेवढय़ात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 जानेवारीपासून शाळा बंद केल्या. शासनाच्या या निर्णयाला इंग्लिश मिडियम स्कूल असोशिएशनसह अन्य शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला. हा विरोध लक्षात घेवू सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळा-महाविद्यालयांनी 15 ते 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नसल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या नियमांचे पालन करीत अध्यापन, अध्ययन केले जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचा, खेळण्या-बागडण्याचा आनंद मिळणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी
3 हजार 45000
माध्यमिक शाळा
1036 35000
महापालिका शाळा आठवी ते बारावी विद्यार्थी
295 19600
राज्य शासनाने शाळा बंदचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाला इंग्लिश मिडिअम स्कूल असोशिएशनच्या वतीने प्रथम विरोधा केला. गुन्हे दाखल झाले तरी शाळा सुरू करणारच ही भुमिका घेतली. कोल्हापुरात सुरू झालेल्या लढय़ाचा वणवा महाराष्ट्रभर पेटला. त्यामुळे अवघ्या दहा दिवसात शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागल्या. आमच्या लढय़ाला यश आले असून, अगामी काळातही संघटना एकजुटीने लढेल.
गणेश नायकुडे (अध्यक्ष, इंग्लिश मिडियम स्कूल असोशिएशन )
शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. प्राथमिक शिक्षक संघाची शाळा सुरू कराव्या ही आग्रही मागणी होती. ऑनलाईन शिक्षणात मर्यादा येत होत्या. आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देण्याचा आनंद आम्हालाही होणार आहे.
लक्ष्मी पाटील (महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ)
शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत 35 संघटनांच्या वतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले होते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर जात होते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होतो. म्हणून शासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
एस. डी. लाड (अध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ)