प्रतिनिधी/ रत्नागिरी
यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे केलेल्या जिल्हाबंदी काळात वाहन वाहतूक बंदीमुळे रत्नागिरी जिह्यातील गतवर्षीपेक्षा अपघातांची आणि बळींची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत मार्गांवर गेल्या 9 महिन्यात 222 अपघातांमध्ये 69 गंभीर तर तब्बल 76 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी अपघाताची नोंद यावर्षी झाली.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे काही महिने जिल्हा बंदी घालण्यात आली. त्याचा परिणाम वाहनांच्या वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र उभे राहिले. त्याचा परिणाम रस्ते अपघातांच्या प्रमाणातही मोठी घट घट झाल्याची बाब दिसली आहे. दरवेळी यापूर्वी महिन्याला मृतांची संख्या 50 च्या आसपास असते. मात्र लॉकडाऊन काळात ही संख्या 10 च्या खाली आली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणात अपघातांची संख्या असते. मात्र यावर्षी या महिन्यात रस्ते अपघातात एकाचाही मृत्यू झालेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. जानेवारी 2020 ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 222 अपघात झाले. त्यापैकी 69 अपघातात 76 जणांचा बळी गेला. जानेवारी माहिन्यात 11, फेब्रुवारी 14, मार्च 7, एप्रिल 0, मे 7, जून 10, जुलै 8, ऑगस्ट 10, सप्टेंबर 9 अशा मृतांचा समावेश आहे. एकूण 222 अपघातात 69 गंभीर, 76 जणांचा मृत्यू झाला. 73 अपघातात 158 जण गंभीर जखमी झाले. तर 51 अपघातात 136 जण किरकोळ जखमी झाले. उर्वरित 29 अपघातात केवळ वाहनांचे नुकसान झाले.