उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना रुग्णांचा वाढता दर व गृह विलगीकरण बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्य़ातील 2 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्य़ात 200 गावांतही केअर सेंटर उभारली जाणार आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. यात ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध होती. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या गृह विलगीकरण बंदीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना कोविड केअर सेंटर, क्वॉरंटाईन सेंटरची निर्मिती करावी लागणार आहे. त्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना खर्च करता येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. 2 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये किमान 10 बेडची व्यवस्था अपेक्षित आहे. कमी लोकसंख्येच्या गावांमध्येही 3 ते 4 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करणे शक्य आहे, त्या बाबत ग्रामपंचायतस्तरावर सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ज्या ग्रामपंचायतींमध्ये कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्या ठिकाणी शनिवार 29 मे पासून कार्यवाहीच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना देण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. भविष्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्यता गृहित धरून रत्नागिरी जिल्हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्षम असावा, यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.