चौथ्या दिवशीही एसटी कर्मचाऱयांचा संप सुरूच
प्रतिनिधी / कणकवली:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या कर्मचाऱयांनी शासनात विलिनीकरणासाठी सुरू केलेला संप जिल्हय़ात सलग चौथ्या दिवशीही सुरू होता. यावेळी सभापती, भाजप तालुकाध्यक्ष, सरपंच संघटना यांनी संपकरी कामगारांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. तसेच भाजपची पंचायत समिती व सरपंच संघटना तुमच्यासोबत असून आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून विधीमंडळातही आवाज उठविण्यात येईल. पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शासनात विलिनीकरणासाठी ठराव घेण्यात येणार असल्याचेही सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले.
येथील बस स्थानक व एसटी विभागीय कार्यालयाच्या बाहेर असलेल्या संपकरी कामगारांची सभापती रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्राr, तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सुहास राणे, पंढरी वायंगणकर, भाजप तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, महेश गुरव, संदीप मेस्त्राr, भाई मोरजकर, मंगेश तळगावकर, गणेश तळगावकर आदींनी भेट घेत पाठिंबा जाहीर केला.
इतर शासकीय कर्मचाऱयांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱयांचे पगार कमी असून ते वेळेत होत नाहीत. शासन सेवेत विलिनीकरणासाठी सुरू केलेले कामबंद आंदोलन योग्य असून त्याला भाजपचा पाठिंबा आहे. भाजप या लढय़ात न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. तालुक्यातील सरपंच संघटनेनेही या लढय़ाला पाठिंबा जाहीर केला आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या बैठकांमध्ये ठराव घेऊन ते शासनापर्यंत पाठविण्यात येणार असल्याचे रावराणे, पारकर, कानडे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हय़ात सुरू असलेल्या या संपाला चौथ्या दिवशीही 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. दिवसभरात एसटीची एकही बस सुटलेली नाही. बसस्थानकांवरही शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते.