वाई तालुक्यातील दोघांनी नोकरी गेल्याने केली आत्महत्या,
प्रतिनिधी/ वाई, भुईंज
ओझर्डे (कदमवाडी ता. वाई) येथील रहिवासी असलेला अभिजीत भिकू कदम (वय 28) वर्ष हा तरुण गेली कित्येक वर्षांपासून वाईच्या एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. पण कंपनीने लॉकडाऊनचे कारण सांगत तीन महिन्यापुर्वी त्याला अचानकपणे कामावरून काढून टाकल्याने आपल्या आयुष्याचे नुकसान झाले असा विचार करुन त्याने राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दोन दिवसांपुर्वीच चिंधवली (ता. वाई )येथील महादेव संजय पवार या 27 वर्षीय तरुणाने देखील बेरोजगारीला कंटाळून राहत्या घराच्या पाठीमागे कृष्णा नदी पात्रालगत असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. तसेच सातारा तालुक्यातील आसगाव येथील सागर साहेबराव येवले (वय 31) या युवकाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मार्च 2020 पासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर बऱयाचशा कंपनीत कामगार कपात मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. अशातच ज्या मुलांवर आपले आख्खं कुटुंब अवलंबून होतं त्याच मुलांना रोजगारापासून वंचित रहावे लागल्यामुळे ते नैराश्येत गेले आहेत. या नैराश्येतून शेवटचा मार्ग म्हणून काही युवक आत्महत्येचा निर्णय घेत आहेत. हे रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.
अभिजीत कदम याच्या आत्महत्येबद्दल अधिक माहिती अशी, नोकरी नसल्याने आपल्याला कोणीही मुलगी देणार नाही, आई वडिलांचे निधन झाल्याने हा घरामध्ये एकटाच राहत असल्याने नोकरीवरून कमी केल्याची खंत त्याला नेहमीच सतावत होती. तो वाईच्या नामांकित कंपनीत गेल्या कित्येक वर्षांपासून काम करीत होता. पण गेल्या तीन महिन्यापुर्वी मयत अभिजीतला कामावरून काढून टाकल्याने त्याला मनस्ताप होत होता. तो सदैव गोंधळलेल्या मनस्थितीत वावरताना दिसायचा. कोरोनोचा आधार घेऊन वाईच्या एमआयडीसीमधील कंपनींच्या व्यवस्थापणाने मर्जीतील कामगारांना कामावर ठेवले. कोणाची तरी सोय करण्यासाठी अनेक चांगल्या कामगारांना देखील कामावरून काढून टाकले आहे. लॉकडाऊनमुळे गेली कित्येक वर्षांपासून काम करत असलेल्या अनेक कामगारांना व्यवस्थापणाने घरीच बसवले आहे. त्यामुळे अनेक कामगार आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेले दिसुन येत आहेत. वास्तविक पाहता कंपनीच्या व्यवस्थापणाने लॉकडॉऊनच्या कालावधीत कामगार कपात करताना गरजू कामगारांचा विचार करून त्यांना कामावर ठेवणे अपेक्षित होते. पण ज्यांचा वशिला कमी पडला अशांना घरचा रस्ता दाखवला. त्याचे रुपांतर आत्महत्येत होताना दिसत आहे.