प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात सहा नगरपंचायतींचा निकाल लागलेला आहे. 102 जागांपैकी 52 जागांवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवत राष्ट्रवादीच्या जिह्यात घडय़ाळ पुन्हा एकदा टीकटीक करु लागले आहे. तर भाजपाचे कमळ दुसऱया क्रमांकावर राहिले आहे. आमदार मकरंद पाटील यांचा करिष्मा लोणंद, खंडाळा नगरपंचायतींमध्ये चालला असून पाटणात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना केवळ दोन जागावर समाधान मानावे लागले. बच्चूदादांनी पाटणमध्ये आपली दादागिरी कायम ठेवली आहे. दहिवडीत गोरे बंधू विरोध फॅक्टर चालला असून राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. कोरेगावात आमदार महेश शिंदें यांच्या पॅनेलनी सत्ताधारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलचे धोबीपछाड केले आहे.
जिह्यात सहा नगरपंचायतीचे निकाल दुपारपर्यंत हाती आले. विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने खंडाळा आणि लोणंद नगरपंचायतीमध्ये आमदार मकरंद पाटील यांचाच करिष्मा चालला आहे. त्यामुळे लोणंदमध्ये राष्ट्रवादीच्या 10 जागा, भाजपाच्या 4 जागा, काँग्रेसच्या 3 जागा लागल्या आहेत. खंडाळय़ात 17 जागांपैकी राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवत 10 जागा जिकंल्या तर भाजपाने 7 जागा जिंकल्या आहेत. पाटणमध्ये बच्चूदादांनी आपलीच पाटणमध्ये चलती असल्याचे दाखवून दिले. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाच्या केवळ दोन जागा निवडून आल्या. तर बच्चू दादांच्या 15 जागा निवडून आल्या. दहिवडीमध्ये आमदार जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे नेते शेखर गोरे या दोन्ही भावांच्या विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर सर्व मंडळी एकत्र असा विधानसभेला जो फॅक्टर होता तोच फॅक्टर आताही केला होता. त्याचे नेतृत्व प्रभाकर देशमुख यांनी केले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या तर भाजपाला 5 जागावर समाधान मानावे लागले. शिवसेना 3 जागा आणि अपक्ष एका जागेवर निवडून आला.
कोरेगावात आमदार महेश शिंदे यांच्या विचारांच्या पॅनेलने सत्ता खेचून आणत आमदार शशिकांत शिंदेच्या पॅनेलचे पानीपत केले. परंतु वडूज नगरपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांना तितकेसे लक्ष घातला आले नाही. ना आमदार जयकुमार गोरेंना लक्ष घालता आले नाही असेच निकालावरुन स्पष्ट होत आहे. कोरेगावात आमदार महेश शिंदे यांच्या विचाराचे 13 जण निवडून आले आहे. वडूज नगरपंचायतीसाठी भाजपा 6 जागा, राष्ट्रवादी 5 जागा, कॉंग्रेस 1 तर अपक्ष 5 जागा विजयी झाल्या आहेत. तेथे राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता आहे.