गाळ काढण्याबाबत कृती आराखडा तयार करणार – जिल्हाधिकारी
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
अतिवृष्टीमध्ये वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याने गाळाने भरलेल्या जिल्हय़ातील सर्व नद्या, नाल्यांचे सर्व्हेक्षण करून कृती आराखडा केला जाणार आहे. सर्व्हेक्षणसाठी सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात आले असून आगामी काळात लोकसहभागातून गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी येथे दिली.
कोकणामध्ये अलीकडील काळात अतिवृष्टीमध्ये वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. यापूर्वीही अतिवृष्टी होत होती. परंतु काही ठराविक सखल भाग किंवा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून पूरपरिस्थिती उद्भवत होती. मात्र गेल्या दोन-चार वर्षांत नद्यांना पूर येत आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नद्या, नाल्यांमधील गाळ. त्यामुळे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे.
22, 23, आणि 24 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सर्वच नद्या, नाल्यांना पूर आला होता. यामध्ये खारेपाटण व बांदा बाजारपेठ पाण्याखाली गेली. गडनदीला पूर आल्याने महामार्गावर पाणी आले, तर कुडाळच्या भंगसाळ नदीला पूर आल्याने पावशी येथे महामार्गवर पाणी आले. कनेडी येथील मल्हार पूल वाहून गेला. अशी अनेक छोटी-मोठी पुले, साकव, रस्ते अतिवृष्टीमध्ये वाहून गेले व मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी शासन स्तरावरून पूरहानी अंतर्गत निधी उपलब्ध झाल्यावर रस्त्याची व पुलाची कामे होणार आहेत. मात्र पूरपरिस्थिती निर्माण होत असलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी गाळाने भरलेल्या नद्यांमधील गाळ काढणे आवश्यक आहे.
जिल्हय़ातील बऱयाच नद्या, नाले गाळाने भरलेल्या आहेत. त्यातील गाळ काढणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हय़ातील सर्व नद्या-नाल्यांचे तसेच तलावांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व तहसीलदार व संबधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. हा सर्वेक्षण अहवाल देण्यामध्ये कोणतीही हलगर्जीपणा न करता योग्यप्रकारे अहवाल देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
गाळाने भरलेल्या नद्या, नाल्यांचे सर्वेक्षण झाल्यावर गाळ काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाणी कमी होताच उन्हाळय़ात गाळ काढून नद्या-नाल्यांची पात्रे खुली केली जाणार आहेत. गाळ काढण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करीत असतानाच गाळ काढण्यामध्ये लोकांचा सहभाग असणे फार महत्वाचे आहे. जर लोकांनी चांगल्याप्रकारे सहभाग दिला, तर जिल्हय़ातील सर्वच नद्या-नाल्यांचा गाळ काढला जाईल आणि भविष्यात अतिवृष्टी कालावधीमध्ये पूर परिस्थिती टाळता येईल. म्हणूनच लोक सहभाग घेऊन नद्या-नाल्यांमधील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
खाडी पात्रातील वाळू काढण्याबाबतही वेळीच लिलाव प्रकिया राबवून शासनाच्या मान्यतेने वाळू उपसा केला जाणार आहे. खाडीपात्राचे मुख खुले केले, तर पाणी समुद्रात जाण्यात अडथळा येणार नाही. नौकानयन मार्गही सुखकर होणार आहे. त्यामुळे खाडी पत्रातील गाळ काढण्याचेही काम केले जाणार आहे. याबाबत लवकरच बैठकही घेतली जाऊन गाळ काढण्याचा कृती आराखडा आतापासूनच तयार केला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
मायनिंग बंदचा निर्णय शासनस्तरावरच!
दरडी कोसळण्याबाबतही दखल घेण्यात आली आहे. कळणे मायनिंग प्रकल्पाचा बांध फुटून मातीमिश्रित पाणी लोकांच्या घरात, शेतात घुसून फार मोठे नुकसान झाले. हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कळणे मायनिंगचे खनिज उत्खनन व वाहतूक करणे तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मायनिंग बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावरच होऊ शकतो, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.