प्रतिनिधी/ सातारा
गेले 64 दिवस अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेली दुकाने बंद होती. मात्र पॉझिटिव्हीटी कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले. शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन सुरू राहणार असून यात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 64 दिवसांनी बाजारपेठा खुल्या होणार असल्याने व्यापाऱयांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या 716 जण बाधित असून पॉझिटिव्हीटी 6.85 टक्के आहे. तर 810 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सकाळी 5 ते सायंकाळी 5 जमावबंदी कायम
कोविड रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस् टक्केवारीच्या निकषानुसार जिल्हय़ाचा तिसऱया स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा सोमवारी 21 रोजी उघडणार आहेत. आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शाळा बंद पण दुकाने निर्धारित वेळेत सुरू
जिल्हय़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षण सुरू असेल. वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कोर्सेस चालू असतील. अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत चालू राहतील. हॉस्पीटलमधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे, नाटय़गृहे पूर्णपणे बंद राहतील.
हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. आठवडय़ाच्या सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत घरपोच पार्सल सेवेस परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींगला परवानगी असेल.
व्यायाम करा फक्त सकाळी 5 ते 9 पर्यंत
सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकलसाठी आठवडय़ाचे सर्व दिवशी सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये सायंकाळी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. शासकीय, निमशासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी आहे. कोणत्याही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल. आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही.
धार्मिक स्थळे बंदच…मेळाव्यांनाही बंदी
सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक स्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे बंद राहतील. तथापि सेवेकरी यांना त्यांच्या सेवा करता येतील. बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. शासकीय कार्यक्रम जागेच्या 50 टक्के क्षमतेने आयोजीत करण्यास परवानगी असेल.
लग्नग्न उरका 25 माणसातच
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. ते वगळून इतर क्षेत्रात लग्नग्न समारंभ दोन तासाच्या कालावधीत 25 लोकांच्या मर्यादेतग्न आयोजन करण्याकामी तहसिलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. अटींचे उल्लंघन झाल्यास प्रथम 25 हजार व दुसऱया वेळी 1 लाख रूपये दंड व फौजदारी कारवाई तसेच लग्न मालकास 25 हजाराचा दंड आकारला जाईल.
अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना परवानगी
अंत्यविधी व दशक्रिया विधी जास्तीत जास्त 20 जणांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी असेल. स्थानिक संस्था, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा ठिकाणाच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी असेल. सर्व बांधकामांना परवानगी असेल. शेतीविषयक दुकाने सर्व दिवस सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे सुरू राहतील.
सार्वजनिक बसेस सुरू
व्यायामशाळा, केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे, स्पा, वेलनेस सेंटर ही आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 100 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी राहील. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उद्योग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल. स्तर पाचमध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हय़ामधून येणाऱया प्रवाशांना वैयक्तिक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल –
रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक, लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे, व्हेटरिनरी हॉस्पिटल्स, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स, वनाशी संबंधित सर्व कामकाज, कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.
716 संशयितांचे अहवाल बाधित
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे-
जावली 39 (8267), कराड 166 (25363), खंडाळा 45 (11423), खटाव 43 (18584), कोरेगांव 75 (16045), माण 63 (12617), महाबळेश्वर 1 (4206), पाटण 47 (7899), फलटण 56 (27763), सातारा 140 (38689), वाई 33 (12295) व इतर 8 (1220) असे आजअखेर एकूण 184371 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
27 बाधितांचा मृत्यू
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे-
जावली 0 (185), कराड 3 (742), खंडाळा 0 (146), खटाव 3 (465), कोरेगांव 3 (369), माण 0(249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4 (184), फलटण 0 (276), सातारा 5 (1183), वाई 1(323) व इतर 0, असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4166 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
810 जणांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 810 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.