प्रतिनिधी/ रत्नागिरी
गुरूवार सायंकाळपासून जिल्हय़ात आणखी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्हय़ातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या 465 झाली आहे. शुक्रवारी कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 3 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 346 झाली आहे. बरे होणाऱयांचे प्रमाण 74 टक्के आहे.
जिल्हय़ात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचाराखाली असलेल्यांची संख्या 103 इतकी असून त्यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचाही समावेश आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दापोली बाजारपेठ येथील एक, बोंडवली येथील 2, गोळप, निरुळ व रत्नागिरी मच्छी मार्केट येथील एकाचा समावेश आहे.
जिह्यात सध्या 51 ?क्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 12 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, खेड तालुक्यात 9 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 10 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 5 आणि मंडणगड मधील 01 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
276 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 79 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 803 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 465 अहवाल पॉझीटीव्ह आले असून 7 हजार 318 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 276 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत असून त्यात कोल्हापूर येथे 4, मिरज येथे 162 तर रत्नागिरीतील 110 अहवालांचा समावेश आहे. जिल्हय़ात होम क्वारंटाईन खाली असणाऱयांची संख्या 44 हजार 418 इतकी आहे.
रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट येथे पनवेलवरून आलेली व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आली आहे. हा रूग्ण थेट पनवेलवरून रूग्णालयात दाखल झाला आहे हा रूग्ण मच्छीमार्केट येथील आहे. तर गोळप येथील 62 वयोवृध्द व्यक्ती तळोजा नवी मुंबई येथून आली होती. ती व्यक्ती होम कोरोंटाईनमध्ये होती
पॉझिटीव्ह रूग्णांचा मुंबईतून प्रवास?
रूग्ण पॉझिटीव्ह असताना आणि अत्यवस्थ असताना ऍब्युलन्सने रत्नागिरी जिल्हय़ात दाखल होत आहेत. गुरूवारी पनवेलमधून थेट ऍब्युलन्समधून जिल्हा रूग्णालयात एक रूग्ण दाखल झाला. अत्यवस्थ स्थितीत मुंबईतून त्यांना पर जिल्हय़ाच्या प्रवासासाठी परवानगी कशी मिळते असा सवाल उपस्थित होत आहे. यापुर्वी त्यांनी टेस्ट केली नसेल का? नातेवाईकांकडून त्याची माहिती लपवून पुन्हा सिव्हीलमध्ये टेस्ट घेतली जाते का असे सवाल उपस्थित होत आहे.
चाकरमान्यांचा ओघ सुरूच
लॉकडाऊन काळात 2 लाख 2 हजार 872 चाकरमानी आले यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ात 53 हजार विना परवाना घेवून चाकरमानी दाखल झालेले आहेत. पावसाळय़ातही ही संख्या वाढतच असल्याने जिल्हय़ातील पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. रत्नागिरी शहरात भाटय़े, झाडगांव, क्रांतीनगर पाठोपाठ आता कोकणनगर, मच्छीमार्केट या परिसरात रूग्ण आढळले आहेत. शहरात रूग्ण वाढू लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.