प्रतिनिधी/ चिपळूण
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकताच जिल्हय़ाचा दौरा केला. यावेळी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकांमध्ये विद्यमान पदाधिकाऱयांनी मारलेली दांडी, कामातील निक्रियता व काही कार्यकर्त्यांनी उघडपणे जाहीर केलेली नाराजी पाहून पाटीलही नाराज झाले. त्यामुळेच पक्षाची सदस्य नोंदणी झाल्यानंतर लवकरच अधिक चांगली टीम पक्षाचे काम करेल, असे पाटील यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गुरूवारपासून 2 दिवस जिल्हय़ाच्या दौऱयावर आलेल्या पाटील यांनी पाचही विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका घेताना भर बैठकीतच पदाधिकाऱयांची हजेरी घेतली. नगर परिषद निवडणुका जवळ असतानाही शहरातील पदाधिकाऱयांनी मारलेली दांडी पाहून ते आश्चर्यचकित झाले. चिपळुणात तर त्यांनी सर्वांना जाहीरपणे सुनावताना प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत ही परिस्थिती असेल तर एरव्ही काय असते, असा प्रश्न उपस्थित केला. चिपळुणात तालुका आणि शहर कार्यकारिणीचे नेमकेच पदाधिकारी हजर असल्याचे पाहून गैरहजेरीला किती प्रमाण असावे, याचे पदाधिकाऱयांनी भान ठेवले पाहिजे, असे पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकीपासूनच जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव जिल्हय़ात फिरकतच नाहीत. खासदार सुनील तटकरे आले की त्यांचे दर्शन होत असल्याचा तक्रारीचा सूर कायम असल्याने पदाधिकाऱयांनी प्रदेशाध्यक्षांकडे जिल्हाध्यक्ष जाधव यांची तक्रार केली. चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते तेरा वर्षापासून पदावर असूनही त्यांच्या कामावर कार्यकर्ते नाराज आहेत. या बैठकीत त्याच्या खेर्डी गावातील कार्यकर्त्यानेच याबद्दल तक्रार केली. यावर तालुकाध्यक्ष कोण, अशी विचारणा करत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पदाधिकाऱयांची झाडाझडती घेतली.
पत्रकार परिषदेत पदाधिकाऱयांबातच्या तक्रारींबाबत विचारणा केली असताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, सध्या सदस्य नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. येत्या दोन-अडीच महिन्यात नव्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या होतील. त्यातून चांगली टीम पक्षाचे काम करताना दिसेल, असे स्पष्ट केले.