सर्व शिक्षकांना मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश
सतीश चव्हाण/ कराड
कोरोना संकटामुळे तीन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या असून सर्व शिक्षकांना मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर शासनाच्या सूचनांनुसार शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीच्या कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 15 जूनला शाळा सुरू करण्यासंदर्भात पहिल्यांदा मागवलेल्या माहितीत जिल्हय़ातील 55 टक्के शाळांनी संमती दर्शवली होती. तर शनिवारी पुन्हा नवीन आदेश काढत शिक्षण विभागाने दुसऱयांदा शाळा सुरू करण्यासंदर्भातील ऑनलाईन माहिती मागवली आहे.
सातारा जिल्हय़ात सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या एकूण जवळपास 814 माध्यमिक व 2997 प्राथमिक शाळा आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्चपासून राज्यासह देशभरातील सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने जिल्हय़ातील सर्व गावांतील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू केले आहे. वास्तविक प्रशासनाने 30 जूनपर्यंत सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील, असे सांगितले आहे. मात्र सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 15 जूनला शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत गेल्या आठवडय़ात सर्व शाळांना शिक्षण समित्यांच्या बैठका घेऊन 15 जूनला शाळा सुरू करता येईल का? याबाबत ऑनलाईन माहिती मागवली होती. यात जिल्हय़ातील जवळपास 55 टक्के शाळांनी सुरू करण्यास संमती दर्शवली होती.
शिक्षण विभागाने शनिवारी नवीन आदेश काढत सर्व शिक्षकांना मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शासनाच्या सूचनांनुसार शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 15 जूनला शाळा सुरू करता येतील का? किती वर्ग सुरू करता येतील? किती विद्यार्थी अथवा पालकांकडे अँड्रॉईड फोन आहेत यासह अन्य प्रकारची माहिती मागवली आहे. सर्व माहितीनंतर शासनाच्या सूचनांनुसार कुठल्या भागातील शाळा कशा प्रकारे सुरू करता येतील याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र शासनाने कधीही शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्यास जिल्हय़ातील शाळा तत्काळ सुरू करता येतील यासाठीची जिल्हा परिषद शिक्षण विभागाची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
मुख्याध्यापकांना जबाबदार धरू नये
शिक्षण विभागाने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. याबाबत मागवलेल्या माहितीत जिल्हय़ातील 55 टक्के मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात संमती दर्शवली आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीनिमित्त बाहेरील शहरात ये-जा करतात अशावेळी एखाद्या विद्यार्थ्याकडून अन्य विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्यास त्यास मुख्याध्यापक अथवा शिक्षकांना जबाबदार धरू नये. कारण लॉकडाऊनच्या काळात सज्ञान लोकांनी सोशल व फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. अशावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळलेच जातील याची खात्री देता येत नाही. तसेच काही शाळा मोठय़ा आहेत. तर काही शाळांत शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे अशा शाळांता दोन सत्रात शाळा घेणेही अवघड होणार आहे.