कराड/ प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हय़ातील सर्व रेशन विक्रेते 1 जूनपासून बेमुदत बंद पाळणार असल्याची माहिती सातारा जिल्हा रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली. या बंदमध्ये जिल्हय़ातील 1709 दुकानदार सहभागी झाले असून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हय़ातील रेशन दुकानदारांना एपीएल कार्डधारकांकडून मोफत धान्यासाठी होणारी दमदाटी, मारहाण, गर्दीमुळे रास्तभाव दुकानदारांना कोविड-19 चा धोका जास्त असल्याने त्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण द्यावे, जिल्हयातील सर्व रास्तभाव दुकानदारांची कोरोना चाचणी मोफत करावी, सर्व रास्तभाव दुकानदारांना 50 लाखाचे विमासंरक्षण मिळावे, मास्क, फेस कव्हर, हँडग्लोज, सॅनिटायझर देण्यात यावे, सर्व रास्तभाव दुकानास पोलीस अथवा होमगार्ड यांची नेमणूक करावी, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी हे रास्तभाव दुकानदारांवर दबाव आणून त्यांना वाटप करण्यासाठी धान्याची मागणी केल्याचे प्रकार घडले आहेत, दुकानदारांनी धान्य न दिल्यास तक्रार अर्ज करण्यात आले आहेत, याबाबत कार्यवाही होण्यासाठी संघटनेने निवेदन दिले होते. त्यात 1 जूनपासून संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आजपासून सर्व रेशन दुकानदार संपावर गेले आहेत.
रेशन विक्रेत्यांनी गेल्या महिन्याचे रेशन वितरण केले आहे. पुढील महिन्याचे वितरणही पुढील आठवडय़ात सुरू होणार आहे. या आंदोलनाने सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ देणार नाही. मात्र शासनाने रेशन दुकानदारांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
अशोकराव पाटील, जिल्हाध्यक्ष 1 केआरडी 5