जलजीवन मिशन अंतर्गत उद्दिष्ट
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सन 2020-21 मध्ये जिल्हय़ातील 1 लाख 18 हजार 507 कुटुंबांना 100 टक्के वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी 47 हजार 475 कुटुंबांना या वर्षात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून 71 हजार 32 कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करणे बाकी आहे. सदर पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतींकडून प्राप्त गावकृती आराखडय़ानुसार जिल्हास्तरीय आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये 294 महसूली गावातील 11 हजार 88 कुटुंबांना सद्या अस्तित्वात असलेल्या नळ योजनेवर थेट नळजोडणी देण्यात येणार आहे. उर्वरित 419 ठिकाणी कार्यात्मक पुर्नजोडणीची कामे व 158 ठिकाणी नवीन योजनांची कामे प्रस्तावित केली आहेत. 184 शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सदर आराखडय़ास पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय पाणी व स्वच्छता समितीने मंजूर केला आहे. जनतेला नियमित व गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने नैसर्गिक ठेवण, विखुरलेली लोकवस्ती याचा विचार करून सर्वस्तरावरील लोक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
जलजीवन मिशनअंतर्गत गावामध्ये नव्याने पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी एकूण भांडवली खर्चाच्या 10 टक्के व डोंगराळ, वनभाग तसेच अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या असलेल्या क्षेत्रासाठी किमान 5 टक्के लोकवर्गणी आवश्यक आहे. ही वर्गणी जलजीवन मिशनच्या मार्गदर्शन तत्वानुसार रोख रक्कमेमध्ये किंवा श्रमदानाद्वारे अदा करता येणार असल्याचे श्रीपाद पाताडे कार्यकारी अभियंता जलजीवन मिशन यांनी सांगितले आहे. जिल्हय़ातील जास्तीत-जास्त गावांनी या योजनेचा लाभ घेऊन गावातील पाणीटंचाई दूर करण्यास तसेच लोकांना स्वच्छ व नियमीत पाणी पुरवठा करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.