खेड, राजापूर, लांजातील बाजारपेठ राहणार सुरू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुकारण्यात आलेल्या राज्य बंदच्या पार्श्वभूमीवर जिह्यात पोलिसांकडून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आह़े मात्र या बंदला जिल्हय़ातील काही व्यापाऱयांनी पाठिंबा तर काही व्यापाऱयांनी विरोध दर्शवला आहे. काही व्यापाऱयांनी सहमती न दर्शवल्याने खेड, राजापूर, लांजातील बाजारपेठ सुरूच राहणार आहेत. तर चिपळुणात व्यापाऱयांच्या भूमिकेत दोन मतप्रवाह दिसत आहेत. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिह्यात बाहेरून फोर्स मागवण्यात आली नसली तरी जिह्यात महत्वाच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत़ तसेच संवेदनशील असलेल्या भागात पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येणार आह़े
उत्तरप्रदेश येथील लखीमपूर येथे शेतकऱयांचा गाडीखाली चिरडून झालेल्या मृत्यूचे देशभर तीव्र पडसाद उमटले होत़े या घटनेप्रकरणी उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांकडून 11 ऑक्टोबर रोजी राज्यभर बंदची हाक देण्यात आली आह़े या पार्श्वभूमीवर जिह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आह़े कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी क्यूआरटी, राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा तैनात ठेवण्यात आल्या आहेत़
मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे व्यापाऱयांची दुकाने बंद ठेवण्यात आली होत़ी आता पुन्हा एकदा बंद पुकारण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाल्याचे दिसत आहेत़ त्यामुळे सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे दुकाने बंद करण्यासंदर्भात व्यापारी विरोध करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े व्यापारीविरूद्ध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्या संघर्ष झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आह़े
ड्रोनची घेणार मदत
पोलिसांकडून बंदच्या पार्श्वभूमीवर ड्रोन पॅमेराचा वापर करण्याची शक्यता आह़े केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शहरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन पॅमेराचा वापर करण्यात करण्यात आला होत़ा तसेच यावेळीही शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर करण्यात येणार आह़े
रत्नागिरीत दुपारी 1 पर्यंत बंद
राज्य बंदमध्ये रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापारी सहभागी होणार आहेत.मात्र सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंतच बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. आधीच कोरोना परिस्थितीमुळे व्यापारी संकटात असल्याने व्यापारी बंदच्या विरोधात होते. मात्र कोणतीही भूमिका न ताणता यामध्ये रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने व चिपळूण व्यापारी संघटनेने सुवर्णमध्य काढीत दुपारी 1 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. दुपारी 1 नंतर मात्र सर्व बाजारपेठ सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी दिली आहे.
जबरदस्तीने दुकान बंद केल्यास कारवाई
रत्नागिरीत बंदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आह़े विविध ठिकाणी पोलीस अंमलदार हे लक्ष ठेवून असतील़ त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल़
-सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी
राजापूर व्यापारी संघाचा बंदला पाठिंबा नाही
आजच्या बंदला राजापूर व्यापारी संघाचा पाठिंबा राहणार नाही. राजापुरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील, अशी माहिती राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी दिली. मात्र लखीमपूर येथे झालेली घटना ही अत्यंत दुदैवी व निंदनीय अशी असून त्याचा आम्ही जाहीर निषेधच करतो, असेही सांगितले. राजापूर शहर बाजारपेठ अगोदरच मंदीच्या गर्तेत आहे. पूरपरिस्थितीमुळे सर्वसामान्य व्यापारी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सोमवारी राज्यात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला राजापूर व्यापारी संघाचा पाठिंबा राहणार नाही, असे ते म्हणाले.
संगमेश्वर महाविकास आघाडीचे आवाहन
संगमेश्वर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदमध्ये तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक, रिक्षा संघटना, एसटी संघटना व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पी. एस. बने स्कूल साडवली येथे या बाबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, तालुकाप्रमुख शिवसेना प्रमोद पवार, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी विवेक शेरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस दत्तात्रय परकर, ज्येष्ठ नेते आबा सावंत, मध्यवर्ती बँक संचालक राजेंद्र सुर्वे, राष्ट्रवादीचे हानिफ हरचिलकर, बाळू ढवळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत तसेच पक्षाचे सहकारी बंधू व व्यापारी बंधू उपस्थित होते.
खेड बाजारपेठ आज सुरूच
राष्ट्रवादीने सोमवारी बंदची हाक देत व्यापाऱयांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बाजारपेठेतील व्यवहार पूर्णपणे सुरळीत चालू राहतील, असे शहर व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे. बंदबाबत शिवसेना व कॉंग्रेसची नेमकी भूमिका समजू शकली नाही
..तर दापोलीत व्यापाऱयांचा सहभाग
दापोलीतील व्यापाऱयांना रविवारी सायंकाळपर्यंत बंदची काहीच माहिती नाही. परंतु जर कोणी बंदबाबत आवाहन करायला आल्यास दापोलीतील व्यापाऱयांकडून बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शहरातील व्यापाऱयांनी सांगितले.
गुहागर, शृंगारतळी, आबलोली बाजारपेठा आज बंद राहणार
गुहागर तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ असलेली शृंगारतळी या बाजारपेठेचा व आबलोली बाजारपेठेचा सोमवार हा वार व्यापार बंदच आहे. यामुळे महाराष्ट्र बंदपेक्षा सोमवारी या दोन्ही बाजारपेठा बंद राहणार आहेत, मात्र गुहागर शहरातील व्यापारी वर्ग या बंदला किती पाठिंबा देतात, हे सोमवारी कळणार आहे.
गुहागर शहर व्यापारी संघटना अध्यक्ष नरेश पवार यांनी सांगितले की, आम्ही शहरातील सर्व व्यापाऱयांना बंदबाबत आवाहन करणार आहोत. बाजारपेठ सुरू राहिल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या बंदला आम्ही पाठिंबा देणार आहोत. गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, पक्षाकडून आलेल्या आदेशाप्रमाणे तालुक्यात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याला व्यापारीवर्गाने चांगला प्रतिसाद दिला असून आजचा महाराष्ट्र बंद आम्ही यशस्वी करून दाखवणार. तर महाराष्ट्र बंदमध्ये कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, असे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी सांगितले. भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले की, महाराष्ट्र बंदचे महाविकास आघाडीने केलेले आवाहन म्हणजे एक प्रकारे भाजपाला बदनाम करण्यासाठी आहे. महाविकास आघाडीच्या काळात अशा अनेक घटना घडत आहेत. यामुळे व्यापारीवर्गांनी या बंद मागचे कारण ओळखावे आणि महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन गुहागर तालुका भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे
लांजा बाजारपेठ सुरूच राहणार
कोरोना कालावधीत 2 वर्षांपासून व्यापाऱयांना त्रास सहन करावा लागला असून भरडून निघाले आहेत. त्यामुळे लांजात सोमवारी (आज) विविध राजकीय पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या भारत बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नसल्याची माहिती लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेटय़े यांनी दिली.